एकीकडे कांदा मातीमोल दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असताना, दुसरीकडे 'मटकी', 'मसूर' च्या दरात वाढ झाली आहे.
युद्धाचा परिणाम कडधान्य मार्केटवर हळूहळू होऊ लागला आहे. इंधनाच्या दरात वाढ होण्याचे संकेत मिळत असल्याने कडधान्य आणखी उसळी घेईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
आपल्याकडे कडधान्याचे उत्पादन खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, गेल्या मान्सूनमध्ये खरीप काढणीवेळी झालेल्या पावसाने उत्पादनावर परिणाम झाला.
त्यात युद्धजन्य परिस्थिती, पावसाबद्दलची साशंकता यामुळे मार्च ते एप्रिल या कालावधीत कडधान्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवली आहे. आता, मटकी व मसूरची कमी उपलब्धता असल्याने दरात वाढ झाली आहे.
मटकीच्या दरात किलो मागे २० रुपये वाढल्याने त्याचा दर १९० रुपयांवर गेला आहे. तर मसूर ५ रुपयांनी महाग होऊन त्याचा दर ८० रुपयांवर गेला आहे.
अलनिनोची व्यापाऱ्यांना धास्ती!
◼️ यंदा मान्सूनवर 'अलनिनो'चा परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पाऊस कमी झाला, तर त्याचा खरिपावर परिणाम होणार आहे.
◼️ कडधान्याचे उत्पादन कमी झाले, तर त्याचा दरावर मोठा परिणाम होणार आहे. काही व्यापारी अंदाज घेऊनच कडधान्य बाजारात आणत आहेत.
कडधान्याची आयात विस्कळीत
इराण-इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे म्यानमार, कॅनडा आणि आफ्रिकेतून भारतात होणारी कडधान्यांची (तुरी, उडीद, डाळी) आयात काहीशी विस्कळीत झाली आहे. ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कडधान्यांच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कडधान्याचे दर (प्रतिकिलो)
कडधान्य | मे २०२५ | मे २०२६
तूर डाळ | ११८ | १३०
हरभरा डाळ | ७० | ८०
उडीद डाळ | १२० | १३०
मसूर डाळ | ७५| ८५
मूग डाळ | ११५ | ११५
युद्धामुळे मटकी, मसूरच्या दरात थोडी वाढ झाली असली, तरी सध्या इतर डाळींचे दर स्थिर आहेत. आगामी खरीप हंगामात पाऊस कसा राहतो, इंधनाच्या दरात किती वाढ होते, यावर कडधान्याचे दर अवलंबून राहणार आहेत. - सदानंद कोरगावकर, धान्य व्यापारी, कोल्हापूर
अधिक वाचा: राज्यातील 'या' सहा मोठ्या धरणांतील गाळ काढण्यास मान्यता; शेतकऱ्यांना आता मोफत गाळ मिळणार
