इंदापूर : दीर्घ काळ अतोनात पडलेला पाऊस, दिवसा मिळालेला अपुरा सूर्यप्रकाश, रात्रीचे कमी तापमान, रासायनिक खतांच्या अमाप वापराने जमिनीतील नायट्रोजन व फॉस्फरस या अन्नद्रव्यांचा ऱ्हास होतो आहे.
या सर्व बाबींमुळे तालुक्यातील सुमारे ६० टक्के पूर्वहंगामी, सुरू व खोडवा असा सर्व तऱ्हेचा ऊस अकाली पक्व होऊन त्याला पांढरे शुभ्र तुरे लागल्याने उसाचे वजन व साखरे प्रमाण घटणार असल्याचे हे गंभीर दिसू लागले आहे.
इंदापूर तालुक्यात छत्रपती सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, बारामती अॅग्रो युनिट आदी कारखाने आहेत.
शेजारच्या बारामती, दौंड तालुके व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा डोळा इंदापूर तालुक्यातील उसावर असतो. त्यामुळे तालुक्यात ऊस मोठ्या प्रमाणात घेतला जातो.
यंदाच्या हंगामात इंदापूर तालुक्यात २९ हजार २९० हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक आहे. उसाला तुरा येणे ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. त्यामुळे उसाचे वजन घटते. उसातील साखरेचे रुपांतर ग्लुकोज व इतर पदार्थांमध्ये होते.
पांढरी साखर कमी
◼️ उसाच्या वाढ्याची प्रत खालावते. तुरे आल्यानंतर प्रथमतः साखरेचे प्रमाण वाढते, मात्र ३-४ महिन्यांनंतर ते झपाट्याने कमी होते.
◼️ रसाची शुद्धता व उसापासून बनवलेली व्यावसायिक पांढरी साखर कमी होते. त्यामुळे साखर उत्पादनात लक्षणीय नुकसान होते.
ऊस संशोधन केंद्र, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटने निर्माण केलेल्या जातींची लागवड आपल्याकडे होते. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने निर्माण केलेल्या ८६०३२ व को २६५ या दोन जातींची लागवड मोठ्या प्रमाणात होते. ८६०३२ या जातीच्या वाणात तुरे येण्याचे प्रमाण नगण्य असते. परंतु को २६५ या वाणाला यावर्षी तुरे आल्याचे जाणवत आहे. या उसाचे लवकरात लवकर गाळप करून घेतल्यास वजन व साखर उतारा यातील संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य आहे. - राजेंद्र वाघमोडे, संचालक म.फुले कृषी विज्ञान केंद्र
अधिक वाचा: पुणे जिल्ह्याला मागे टाकत सर्वाधिक ऊस गाळप करण्यात 'हा' जिल्हा आला राज्यात टॉपवर
