आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त सातव्या माळेच्या दिवशी मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत २०२५-२६ चा पाण्याचा ताळेबंद सादर करण्यात आला. नवरात्र उत्सवात पाण्याचा ताळेबंद सादर करण्याची ही परंपरा सलग २१ व्या वर्षीही कायम ठेवण्यात आली.
ग्रामसभेला आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, सरपंच विमल ठाणगे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष छबूराव ठाणगे, उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर आदी उपस्थित होते.
दरम्यान, यशदा पुणे येथे जागतिक नदी दिनानिमित्त आयोजित 'नदीसाठी युवा शक्ती' कार्यक्रमात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, यशदा महासंचालक सुधांशू कुमार उपस्थित होते.
तसेच उपमहासंचालक डॉ. शेखर गायकवाड, अतिरिक्त महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी आदींच्या हस्ते हिवरे बाजार गावाचा सन २०२५-२६ चा पाण्याचा ताळेबंद प्रकाशित करण्यात आला.
असा केला जातो ताळेबंद?
◼️ गावाच्या वापरासाठी ३४२.५४ कोटी लिटर पाणी उपलब्ध.
◼️ गावाच्या विविध वापरासाठी वार्षिक गरज ३३९.८६ कोटी लिटर.
◼️ त्यात लोकसंख्या व जनावरांसाठी पिण्याचे पाणी ७.७१ कोटी लिटर.
◼️ खरीप पिकांसाठी १३२.८० कोटी लिटर.
◼️ रब्बी पिकांसाठी १२६.५ कोटी लिटर.
◼️ उन्हाळी पिकांसाठी (प्रस्तावित) २४ कोटी लिटर.
◼️ बारमाही पिकांसाठी ४२ कोटी लिटर.
◼️ इतर वापरांसाठी ६.८५ कोटी लिटर अशी गरज आहे.
◼️ एकूण ३२५.३१ कोटी लिटर पाणी आवश्यक आहे.
◼️ याशिवाय भविष्यासाठी २.६८ कोटी लिटर पाणी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यंदा ५२४ मिमी पाऊस
यंदाच्या पाण्याच्या ताळेबंदानुसार यावर्षी २४ दिवसांत एकूण ५२४ मिमी पाऊस झाला असून, त्यातून ५११.८६ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले असल्याचे पवार म्हणाले.
१९९५ पासून हिवरेबाजार येथे पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकांचे नियोजन केले जात असून सुरुवातीला फक्त एकच पर्जन्यमापक होता. मात्र, २००४ नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसवल्याने ताळेबंद अचूक तयार होऊ लागला.
अधिक वाचा: ऊस पिकात जेठा कोंब का मोडावा? त्याची योग्य वेळ कोणती व तो कसा मोडावा? वाचा सविस्तर