हणमंत पाटील
टेंभू उपसा सिंचन योजनेने सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पीक पद्धतीत (क्रॉप पॅटर्न) आमुलाग्र बदल झाला. तो इतका की उपजीविकेसाठी ज्वारी, बाजरी काही कडधान्यांचे उत्पन्न घेणाऱ्या दुष्काळी भागात ऊस, द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला व फुलांच्या नगदी पिकांचे (कॅश क्रॉप) उत्पादन सुरु झाले आहे.
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उत्पन्नात पाच ते दहा पटीने वाढ झाली. त्यामुळे दुष्काळी भागात अलिशान बंगले, इम्पोर्टेड कार दिसू लागल्या आहेत. या क्रांतिकारक बदलाने दुष्काळी भागाची वाटचाल सामाजिक व आर्थिक सुधारणांच्या दिशेने सुरू असतानाच बीअर-बार हॉटेलसारखी काही आमिषेपण परिसरात वाढू लागली आहेत.
टेंभू योजना येण्यापूर्वी दुष्काळी भागात प्रामुख्याने पावसावर अवलंबून मोजकी पिके घेतली जायची. त्यामध्ये कमी उत्पन्न असलेल्या तृणधान्यांबरोबर तूर, मटकी, मूग अशा कडधान्यांचाही समावेश होता. पाऊस वेळेवर पडला नाहीतर अनेकदा ही पिकेही पूर्णपणे वाळून जात किंवा त्यांचे उत्पादन खूप कमी असे.
आता टेंभूचे पाणी आल्याने एकाऐवजी उन्हाळ्यासह तिन्ही हंगामात पिके घेतली जातात. त्यामध्ये शेतकरी प्राधान्याने जास्त उत्पन्न देणारी नगदी पिके घेऊ लागला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर, मेथी या पालेभाज्यांसह वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरची, वाटाण्यासारख्या फळभाज्या घेतल्या जात आहेत.
तसेच, द्राक्ष, डाळिंब, ड्रगन फ्रूट, पेरु, आंब्याच्या बागांतून उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण हराला आहे. फळांच्या उत्पादनामुळे शेतीवर आधारित दुग्ध व्यावसाय व कृषी प्रक्रिया उद्योगांनाही चालना व प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे या भागातून नोकरी व रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतराला ब्रेक लागण्यास सुरवात झाली आहे.
टँकरची गावे निर्यातीची केंद्रे
• टेंभू योजनेमुळे दुष्काळी भागात बागांचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. उदाहरणार्थ तासगाव, आटपाडी आणि सांगोला यांसारख्या तालुक्यांमश्रो द्राक्ष आणि डाळींबाचे उत्पादन हे आता येथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनले आहे.
• तासगावची बाजारपेठ द्राक्ष आणि बेदाण्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते. या फळबागांमुळे केवळ शेतीतच नाही, तर कृषी-प्रक्रिया उद्योगातही (उदा. फळांचे पल्प, गुन्हाळे, बेदाणा निर्मिती यूनिट्स व स्टोअरेज) वाढ झाली.
उपसा सिंचनामुळे एकूण फळबाग क्षेत्र
सांगली - ५८००० हेक्टर
सातारा - ७४५२ हेक्टर
फळ पिकांच्या उत्पादनात दरवर्षी ३ ते ४ टक्के वाढ होतेय हेही विशेष.
दुष्काळाचा बदललेला क्रॉप पटर्न
• टेंभू योजनेपूर्वीची पिके : (तृणधान्य) ज्वारी, बाजरी, गहू. (कडधान्य) हरभरा, भुईमूग, तूर, मटकी, मूग.
• नव्याने बदललेली पीक पद्धती : (फळभाज्या) वांगी, भोपळा, दोडका, टोमॅटो, मिरची. (नगदी पिके) ऊस, द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू, ड्रगन. (फुलशेती) झेंडू, गुलाब, जरबेरा, शेवंती.
उसाच्या क्षेत्रात वाढ, कारखान्यांचे पुनरुज्जीवन
• टेंभूने ज्या भागात पाण्याची शाश्वत उपलबधता झाली, तेथे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ऊस हे अधिक पाणी लागणारे पीक असले तरी, त्याला बाजारपेठेत चांगली मागणी आणि निश्चित भाव मिळत असल्यामुळे शेतकरी त्याला प्राधान्य देतात.
• उसाच्या लागवडीमुळे साताऱ्यात १६आणि सांगलीत १९ सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे जाळे विस्तारले आहे. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळाली आहे.
फुलशेतीच्या शेतकऱ्याचा अनुभव
उच्च शिक्षित शेतकरी माधव माने म्हणाले, "भी बीएस्सीनंतर ॲनिमेशन डिप्लोमा केल्यानंतर उदरनिर्वाहासाठी मुंबईला गेली. १० वर्षांच्या नौकरीनंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्शन हेड म्हणून एक लाखांपर्यंत पगार होता, कोरोना काळात गावात थांबलो, त्यावेळी टेंभू योजनेचे पाणी गावात आले होते. मी धाडसाने गावातील शेतीत पाण्यामुळे फुलेशेती, ड्रगन, सीताफळ व आंब्याची बाग लागली. आता मुंबईतील पगारापेक्षा शेतीमध्ये जेवढे कष्ट कराल तेवढे जास्त पैसे मिळतात."
शेतकऱ्यांची सामाजिक, शैक्षणिक अन् आर्थिक पत वाढली
शेतकऱ्यांची सामाजिक व आर्थिक सुधारणा (ऐपत) चागंली झाल्याने जुन्या पत्र्याच्या व कौलाच्या घरांची बंगले उभे राहिले. इम्पोर्टेड मोटारी आल्या. शिक्षणावर खर्च करण्याची ऐपत वाढली. त्यामुळे दुष्काळी भागात आता पुणे व मुंबईतील प्रसिद्ध शिक्षण संस्थांच्या शाखा आल्या. त्यामध्ये भारती विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील, पोदार इंटरनॅशनल स्कूल तालुक्याच्या ठिकाणी सुरू झाल्या. विट्यासारख्या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी मल्टीप्लेक्स थिटर आणि मॉल उभारले गेले. मात्र, या वाढत्या ऐपतीने तरुणांची पावले गावांच्या वेशीवर असलेल्या बीअर बारकडे वळण्यात्ता धोकाही निर्माण झाला आहे. - प्रा. संजय ठिगळे, अर्थशास्त्र अभ्यासक, सांगली.
पूर्वी आमच्या दुष्काळी भागात पाणी नसल्याने शेतक-यांना मजुरी परवडत नसल्याने ते एकमेकांच्या शेतात मजुरीचा पैरा करायचे. आता टेंभूचे पाणी आल्याने आमच्या भागातील शेतजमिनीत फळे व फुलांच्या बागा फुलविल्या आहेत. एकेकाळी मोलमजुरी करणारे शेतकरी आता बागायतदार झाले आहेत. - शंकर सूर्यवंशी, डाळिंब बागायदार, खानजोडवाडी, ता. आटपाडी.