अहिल्यानगर : एकीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती व व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवत आहे. हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजक अनेक क्षेत्रात गॅस नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मात्र, या संकटकाळात अहिल्यानगरमधील एका तरुणाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत घरातील ओल्या कचऱ्यापासून स्वयंपाकासाठी उपयुक्त असा गॅस तयार केला आहे. या उपक्रमामुळे एकाच वेळी गॅसटंचाई आणि कचरा व्यवस्थापन अशा दोन्ही समस्यांवर मात होत आहे.
सावेडी परिसरातील प्रशांत दरेकर या तरुणाने घरातील ओल्या कचऱ्यापासून स्वयंपाकासाठी उपयुक्त असा गॅस तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी या उपक्रमाला भेट देऊन पाहणी केली.
दरेकर यांनी उभारलेल्या या घरगुती बायोगॅस प्रकल्पामध्ये दररोज जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने निचरा केला जातो आणि त्या प्रक्रियेतून थेट स्वयंपाकाचा गॅस मिळवला जातो.
सामान्यतः घरोघरी दुर्गंधी पसरवणारा आणि डोकेदुखी ठरणारा ओला कचरा, योग्य पद्धतीने हाताळल्यास किती फायदेशीर ठरू शकतो, हे प्रशांत यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
त्यांच्या या प्रकल्पामुळे एलपीजी गॅसच्या खर्चात वर्षाकाठी तब्बल ७० टक्क्यांपर्यंत बचत करणे शक्य असल्याचे दरेकर यांचे म्हणणे आहे. या प्रक्रियेतून केवळ गॅस मिळतो असे नाही, तर याच कचऱ्याचा वापर करून भविष्यात वीजनिर्मितीही करता येऊ शकते.
उपक्रमाचे हे फायदे
◼️ गॅस खर्चात बचत होते.
◼️ तसेच कचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होते.
◼️ प्रदूषण कमी करण्यास या उपक्रमाची मदत होते.
◼️ बागेसाठी उत्तम जैविक खत उपलब्ध होते. असे उपक्रम नागरिकांनी राबवायला हवेत.
घरातील ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करणारा प्रकल्प कमी खर्चात होते. यातून पर्यावरण संवर्धनालाही बसविता येतो. साडेचार बाय साडेचार फूट जागेमध्ये हा प्रकल्प बसतो. साधारणतः तीन वर्षात पैसे फिटतात. यामुळे गॅस खर्चात बचत होते तसेच बागेसाठी जैविक खतही मिळते आणि कचरा व्यवस्थापनही हातभार लागतो. - प्रशांत दरेकर, सावेडी
कचऱ्यातून गॅस निर्मितीच्या उपक्रमांमुळे एलपीजी गॅसची मोठी बचत तर होईलच, शिवाय कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्नही सुटेल. 'कचरामुक्त व ऊर्जासंपन्न अहिल्यानगर' बनवण्याच्या दृष्टीने दरेकर यांचा हा घरगुती प्रकल्प अत्यंत उपयुक्त आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा एक आदर्श आणि पथदर्शी उपक्रम आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घरी हा प्रकल्प राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. - यशवंत डांगे, आयुक्त महापालिका
अधिक वाचा: राज्यात 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२० च्या खरीप पीक विम्याचे पैसे मिळणार; शासन निर्णय जारी
