Lokmat Agro >शेतशिवार > कुसळांच्या जागी फुलल्या फळं अन् फुलांच्या बागा; दुष्काळी भागातील पुनरुत्थानाची वाचा यशस्वी गाथा

कुसळांच्या जागी फुलल्या फळं अन् फुलांच्या बागा; दुष्काळी भागातील पुनरुत्थानाची वाचा यशस्वी गाथा

Fruit and flower gardens bloom in place of the bushes; a successful story of revival in drought-stricken areas | कुसळांच्या जागी फुलल्या फळं अन् फुलांच्या बागा; दुष्काळी भागातील पुनरुत्थानाची वाचा यशस्वी गाथा

कुसळांच्या जागी फुलल्या फळं अन् फुलांच्या बागा; दुष्काळी भागातील पुनरुत्थानाची वाचा यशस्वी गाथा

Tembhu Water Project Success Story : एकेकाळी ज्या दुष्काळी तालुक्यात कुसळे दिसायची, त्या सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी सात तालुक्यात आज द्राक्ष, डाळिंब, पेरू आणि केळीच्या बागा डोलताना दिसतात.

Tembhu Water Project Success Story : एकेकाळी ज्या दुष्काळी तालुक्यात कुसळे दिसायची, त्या सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी सात तालुक्यात आज द्राक्ष, डाळिंब, पेरू आणि केळीच्या बागा डोलताना दिसतात.

शेअर :

Join us
Join usNext

हणमंत पाटील 

एकेकाळी ज्या दुष्काळी तालुक्यात कुसळे दिसायची, त्या सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी सात तालुक्यात आज द्राक्ष, डाळिंब, पेरू आणि केळीच्या बागा डोलताना दिसतात.

हमखास पैशाची हमी देणारा ऊस तौन्यात उभा आहे. टेंभू उपसा जलसिंचन योजना आल्याने झालेला हा दुष्काळी भागाचा कायापालट केवळ पीक-पाण्यापुरता उरला नसून, त्यामुळे सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडून आले.

हे परिवर्तन व कायापालट चमत्कार वाटावा, असा असला तरी त्यामागे सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी, जलसिंचन विभाग व स्थानिकांचा ३० वर्षांतील प्रयत्न, त्याग व संयमाच्या प्रतीक्षेचे हे फलित मानले जाते.

पूर्वी सातारा जिल्ह्यातील माण तालुका, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला यासारखे तालुके है कायम दुष्काळी म्हणून ओळखले जात होते. सह्याद्रीच्या पूर्वेकडील अवर्षणप्रवण भाग असल्याने पावसाच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते.

पाणी, चारा टंचाईमुळे दुष्काळ पाचवीला पुजलेला होता. येरळा, अग्रणी व माणसासारख्या नद्यांचा कोरडा प्रदेश होता. त्यामुळे येथे फक्त कुसळे, निवडुंग आणि वाभळीच्या झुडपांशिवाय काहीही उगवत नव्हते.

शेती पावसावर अवलंबून असल्याने वर्षातून एखादे पीक आले, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठीही मैलोन्मैल भटकावे लागे. त्यामुळे या भागातील मुलांना लग्नासाठी मुलगी देण्याचे धाडस करावे लागायचे. 

टेंभू उपसा सिंचन योजनेतील पाच टप्प्यांची अंमलबजावणी म्हणजे संपूर्ण दुष्काळी भागाच्या पुनरुत्थानाची गाथा म्हणावी लागेल. आज वर्षभरातील तिन्ही ऋतूमध्ये हिरवीगार शेती फुलत आहे. हे परिवर्तन केवळ डोळ्यांनाच नाही, तर स्थानिक लोकांच्या जीवनात आणि चेहऱ्यावरही आता स्पष्टपणे दिसू लागले आहे.

कारण कुसळ्याच्या माळरानातून टेंभू योजनेचे पाणी पाइपलाइन, कालवा व उपकालव्यांद्वारे गावागावात पोहोचले आहे. जिथे कधी पाणी नव्हते, विहिरीसाठी दगडाच्या खाणीत बार उडविले जायचे, तिथे आता पंप आणि मोटारींचा आवाज ऐकू येतो. ऐन उन्हाळ्यात शेतातून पाण्याचे पाट वाहताना 'लोकमत'ने केलेल्या ग्राउंड रिपोर्टवेळी दिसून आले.

टेंभू योजनेची टप्प्याटप्प्याने झाली प्रगती...

१९९६ टप्पा क्रमांक १ (अ-ब) : टेंभू ते सुरली घाट

२००९ टप्पा क्रमांक २ : हिंगणगाव (कडेगाव)

२०१४ टप्पा क्रमांक ३ : माऊली

२०१७ टप्पा क्रमांक ४ : वेजेगाव

२०१९ टप्पा क्रमांक ५ : भूड

दुष्काळातील स्थलांतराला ब्रेक...

• खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ व सांगोला तालुक्यांना जोडणाऱ्या घाटमाथा व उतारावर एकेकाळी कुसळांचे व खुरट्या झुडपांचे साम्राज्य होते. त्याच जागी आता लांबच लांब द्राक्षांच्या हिरव्यागार बागा आणि डाळिंबाची झाडे डोलताना दिसतात. पूर्वी येथील शेतकरी केवळ ज्वारी, बाजरी, मका यासारखी कोरडवाहू पिके घेत असत.

• त्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी मुंबई, पुणे व गलाई व्यावसायाच्या निमित्ताने देशभर स्थलांतर व्हायचं, टेंभू प्रकल्पाने या भागात आलेल्या बारमाही शेतीमुळे स्थानिकांच्या स्थलांतराला ब्रेक लागला आहे, अशी माहिती भाळवणी (खानापूर, सांगली) येथील प्रगतिशील शेतकरी हरिदास गुरव यांनी दिली.

बदललेले सामाजिक अन् पर्यावरणीय चित्र...

• टेंभू योजनेमुळे केवळ शेतीतच नव्हे, तर स्थानिक पर्यावरणातही सकारात्मक बदल घडून आले आहेत. भूजल पातळीत काही प्रमाणात सुधारणा दिसून येत आहे. कुसळे आणि काटेरी झुडपांच्या जागी हिरवीगार शेते, फळबागा आणि झाडेझुडपे वाढल्याने जैवविविधता (बायोडाव्हर्सिटी) वाढली आहे.

• त्यामुळे पशु-पक्ष्यांचे आणि इतर लहान जिवांचे वास्तव्य वाढले. गावांमध्ये एक प्रकारची शांतता आणि स्थैर्य आले. है परिवर्तन केवळ आकड्यांमध्ये मोजण्यासारखे नाही, तर ते हजारो शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्य व समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे 'लोकमत'च्या पाहणीत दिसून आले.

छावण्यांच्या जागी, दुग्धोत्पादन केंद्र...

• पूर्वी मान्सूनचा पाऊस लांबला की शेतकऱ्याला तहसीन कार्यालयाबाहेर चारा छावणीसाठी याचना व आंदोलन करावे लागायचं; आता तिथे टेंभू योजनेने पाण्याची शाश्वतता आली. त्यामुळे ऊस हे महत्त्वाचे नगदी पीक आले. उसाला हमी भाव मिळत असल्याने दुष्काळी भागातील शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागलाय, वर्षभर भाजीपाला पिकतोय.

• त्यामुळे जनावरांसाठी हिरवा चाराही मुबलक उपलब्ध झाल्याने दुग्ध व्यवसायालाही चालना मिळाली. जिथे पाण्यासाठी जनावरे विकावी लागत होती, तिथे आज दुग्धोत्पादन हे एक स्थिर उत्पन्नाचे साधन बनले, असे माहुली (ता. खानापूर) येथील दुग्ध संकलन केंद्राचे संचालक गणेश माने यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा : (भाग-०१) आशिया खंडातील सर्वांत मोठा 'हा' उपसासिंचन प्रकल्प ठरतोय शेतीसाठी वरदान; जाणून घ्या सविस्तर

Web Title: Fruit and flower gardens bloom in place of the bushes; a successful story of revival in drought-stricken areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.