हणमंत पाटीलकृष्णा नदीवरील टेंभू या आशिया खंडातील सर्वात मोठी उपसासिंचन योजनेचे पाच टप्पे पूर्णत्वास आले. सहाव्या टप्प्याचे काम सुरू आहे. सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी सात तालुक्यांतील २०० हून अधिक गावांसाठी 'जीवनवाहिनी' ठरलेल्या योजनेने या भागात आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडले. त्याचा ग्राउंड रिपोर्ट 'टेंभू योजनेने दुष्काळाचा कायापालट' या वृत्तमालिकेद्वारे आजपासून मांडत आहोत.
आशिया खंडातील सर्वांत मोठा टेंभू उपसासिंचन प्रकल्पाची अंमलबजावणी १९९६ मध्ये सुरू झाली. गेल्या ३० वर्षातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अथक प्रयत्नातून टेंभूचे पाच टप्पे प्रत्यक्षात आले.
त्यामुळे सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांतील दुष्काळी सात तालुक्यांचे नंदनवन झाले. या प्रकल्पासाठी मार्च २०२५ अखेर ३ हजार ८०० कोर्टीचा खर्च झाला असून, त्यातून सुमारे ७३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
साधारण १९९० च्या दशकात जेव्हा कृष्णा नदीचेपाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याची संकल्पना पुढे आली.
त्यावेळी लोकांना हे दिवास्वप्न वाटले; परंतु प्रामुख्याने क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांची पाणी संघर्ष चळवळ, माजी आमदार संपतराव देशमुख, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील व अनिल बाबर या दिवंगत नेत्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांच्या प्रयत्नानंतर टेंभूचे पाणी पाचव्या टप्प्यांतील सांगोला तालुक्यात पोहोचले.
टेंभू या गावात मोठे बॅरेजसातारा जिल्ह्यातील कऱ्हाडजवळ असलेल्या टेंभू या गावात मोठे बॅरेज टाकून हे पाणी अडविण्यात आले. तेथून १९९६ मध्ये पहिल्या टप्प्यात क्रमांक एकमधून हे पाणी दोनवेळा उंच खड्या डोंगरावर पहिल्यांदा (अ) ६१ मीटर आणि (ब) ८५ मीटर मोठ्या अश्वशक्त्तीच्या ३३ पंपाद्वारे उचलले.
१४६ मीटर उंच घाटमाथ्यावरून पाच टप्यांत दुष्काळी भागासाठी◼️ सुर्ली घाट परिसरातील उंचावरील खांबाले बोगद्यात सोडण्यात आले.◼️ २००२ मध्ये खांबाले बोगद्यातून हे पाणी घाटमाथ्यावरून कडेगाव तालुक्यात टप्पा क्रमांक २ हिंगणगाव येथे आणण्यात आले.◼️ पुढे खानापूर तालुक्यात २०१४ मध्ये टप्पा क्रमांक ३ माहुली, २०१७ मध्ये टप्पा क्रमांक ४ वेजेगाव आणि २०१२ मध्ये टप्पा कमांक ५ भड येथे सोडण्यात आले.◼️ सुमारे २०० गावांतील कोरडवाहू असलेले ७३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले आहे.◼️ त्यासाठी आतापर्यंत ३ हजार ८०० कोटीचा खर्च झाला आहे.◼️ येत्या जून २०२५ अखेरपर्यंत काम पूर्ण झाल्यास ८० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
टेंभू उपसासिंचन योजनेला पहिल्यांदा १९ फेब्रुवारी १९९६ साली साधारण १ हजार ४१६ कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली. आता पाचही टप्पे पूर्णत्वास आले असून, त्यासाठी आतापर्यंत ३ हजार ८०० कोटींचा खर्च झाला आहे. मात्र, अपेक्षित खर्च साधारण ४ हजार कोटींचा असून, उर्वरित कामे जून २०२५ अखेर पूर्ण करण्याचे आणि ८० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. - राजन रेड्डीयार, तत्कालीन कार्यकारी अभियंता टेंभू उपसा प्रकल्प
अधिक वाचा: सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी 'या' पोर्टलवरून अर्ज घेण्यास सुरवात; कसा कराल अर्ज?