पोपट पवार
कोल्हापूर : अर्ज केल्यानंतर लगेच विनातारण १० ते १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, कर्जावरचे १२ टक्क्यांपर्यंतचे व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मिळत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील २३ हजारांहून अधिक तरुणांनी जनावरांच्या शेळीपालन, गोठ्यापासून कुक्कुटपालनसह, छोट-मोठे उद्योग उभारले.
मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून एक रुपयाचाही व्याज परतावा लाभार्थ्यांना मिळाला नसल्याने व्यवसाय उभारणाऱ्या तरुण-तरुणींना आता हे प्रकल्प गुंडाळण्याची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे आठ-आठ महिन्यांपासून व्याज परतावा मिळाला नसल्याने जनावरांचे गोठे उभारणारे काही तरुण दावणीतील जनावरे विकून हप्ते भरत आहेत.
राज्यातील मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून व्याज परतावा योजना सुरू केली. तरुणांना स्वयंरोजगारासाठी १० ते ५० लाखांपर्यतच्या कर्जावर व्याज परतावा दिला जातो.
ही योजना १० लाख ते ५० लाखांपर्यंतच्या कर्जमर्यादेत असून, नियमित परतफेडीवर १२ ते १३ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा महामंडळाकडून थेट बँक खात्यात दिला जातो.
या माध्यमातून राज्यात एक लाख ८१ हजार ३२४ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक २३ हजार ३६८ तरुणांनी व्यवसाय सुरू केले आहेत.
ऑनलाइन सिस्टिमला व्याज परताव्याचा प्रस्ताव सादर केला की, ४५ दिवसांपर्यंत परतावा संबंधितांच्या बँक खात्यात जमा होतो. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून प्रस्ताव सादर करूनही अद्यापपर्यंत परतावा मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.
त्यामुळे कर्ज तर घेतले; पण व्याज परतावाच आठ-आठ महिने मिळत नसल्याने लाभार्थी अडचणीत आले आहेत. त्यामुळे हे लाभार्थी नवीन आर्थिक दुष्टचक्रात आढळत आहेत.
महामंडळाकडे पैशांची चणचण
◼️ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे व्याज परतावा देण्यासाठी निधी नाही.
◼️ लाभार्थी रोज जिल्ह्यातील महामंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारतात. मात्र, निधी आल्यावर परतावा मिळेल, असे सांगण्यात येते.
५० लाखांपर्यंत कर्ज
◼️ तरुणांना स्वयंरोजगारासाठी १० ते ५० लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याज परतावा दिला जातो.
◼️ ही योजना १० लाख ते ५० लाखांपर्यंतच्या कर्जमर्यादेत असून, नियमित परतफेडीवर १२ ते १३ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा थेट बँक खात्यात दिला जातो
महामंडळाकडे निधी नसल्याने व्याज परतावा थकला आहे. महामंडळाला निधी मिळावा, यासाठी वित्त विभागाकडे मागणी केली आहे. निधी आला की, व्याज परतावा दिला जाईल. - विजय देशमुख, व्यवस्थापक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य
या योजनेतून गेल्या नऊ महिन्यांपूर्वी जनावरांच्या गोठ्यासाठी कर्ज घेतले होते. मात्र, अद्याप एक रुपयाचाही व्याज परतावा मिळालेला नाही. त्यामुळे अडचणीत आलो आहे. - दीपक खवरे, गोठामालक, पोर्ल तर्फे ठाणे (ता. पन्हाळा)
एक चांगले सुरू असलेले महामंडळ बंद पाडण्याचा डाव सरकारचा आहे का? व्याज परतावा मिळत नसल्याने बँकांचे हप्ते भरण्यासाठी तरुणांना सावकारांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. ज्यांच्या नावाने महामंडळ आहे त्यांच्या पुत्रांना शोधायची वेळ आली आहे. - संजय पवार, उपनेते, उद्धवसेना, कोल्हापूर
अधिक वाचा: Monsoon Update : नैर्ऋत्य मान्सून येण्याची तारीख जाहीर; किती तारखेला दाखल होणार मान्सून?
