पुणे : राज्यातील यंदाचा साखर हंगाम संपण्याच्या मार्गावर असून यंदा सुरू झालेल्या २१० सहकारी व खासगी साखर कारखान्यांपैकी आतापर्यंत १२६ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत.
राज्यात आतापर्यंत १ हजार १० लाख टन उसाचे गाळप झाले असून, ९५ लाख ६९ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या गाळपातून ९.७४ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
सर्वाधिक २३ लाख टन साखरेचे उत्पादन कोल्हापूर विभागातून झाले असून पुणे विभागात २१ लाख टन साखर उत्पादित करण्यात आली आहे.
यंदा राज्यातील २१० सहकारी व खासगी कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाकडून गाळपाचे परवाने घेतले होते. यंदा पावसाळा लांबल्याने गाळप हंगामाला उशीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात होती.
मात्र, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत गाळप हंगाम एक नोव्हेंबर रोजी सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. गेल्यावर्षी लागवड झालेल्या उसाचे क्षेत्र तुलनेने कमी असल्याने गाळपास येणारा ऊस हा कारखान्याच्या गाळप क्षमतेच्या तुलनेत कमी होता.
त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम मार्चअखेरीस संपेल, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे म्हणणे होते. त्यानुसार राज्यात आतापर्यंत १२६ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. तर ८४ कारखाने अद्यापही सुरू आहेत.
या कारखान्यांनी आतापर्यंत १ हजार १० लाख टन उसाचे गाळप केले असून, यातून ९५ लाख ६९ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या हंगामात आतापर्यंत ९.४७ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
कोल्हापूर विभागात २३ लाख १० हजार टन, तर त्याखालोखाल पुणे विभागात २१ लाख ३० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
सोलापूर विभागात १८ लाख ४८ हजार, अहिल्यानगर विभागात ११ लाख ३१ हजार, छत्रपती संभाजीनगर विभागात ८ लाख ८४ हजार, नांदेड विभागात १ लाख १४ हजार, अमरावती विभागात १ लाख १० हजार टन साखर उत्पादित झाली आहे.
कोल्हापूरला सर्वाधिक
◼️ साखर उताऱ्याचा विचार करता कोल्हापूर विभागात सर्वाधिक ११.०१ टक्के साखर उतारा मिळाला असून, त्याखालोखाल पुणे विभागात ९.८४ टक्के उतारा मिळाला आहे.
◼️ नांदेड विभागात ९.३८, अमरावती विभागात ९.३२, अहिल्यानगर विभागात ९.०७, तर सोलापूर विभागात ८.५७ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
अधिक वाचा: ऊस काटा मारीवर अंकुश ठेवण्यासाठी अखेर शासनाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर
