शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडून 'किसान क्रेडिट कार्ड'द्वारे तीन लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
पशुपालन, शेळी, मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत त्यांच्या पशुधनाच्या संगोपनासाठी व दैनंदिन खर्चासाठी (खेळते भांडवल) आकर्षक व्याज सवलतीसह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. जास्तीत जास्त पात्र पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी किंवा दूध संस्थेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहआयुक्त डॉ. देवेंद्र जाधव यांनी केले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध होणार आहे. दूध संस्थेची हमी असल्यास ही मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढविता येणार आहे, तसेच ज्यांच्याकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड आहे, अशा शेतकऱ्यांनाही ३ लाख रुपयांपर्यतची पतमर्यादा वाढवून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
कर्जाचा मूळ व्याजदर ९ टक्के असला, तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून ३ टक्के व राज्य शासनाच्या शासननिर्णयानुसार ४ टक्के अशी एकूण ७ टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळते. याशिवाय बँकांकडून २ टक्के व्याज सवलत दिली जात असल्याने पात्र आणि नियमित परतफेड करणाऱ्या पशुपालकांना प्रत्यक्षात शून्य टक्के व्याजदराचा लाभ घेता येतो, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सर्व पशुपालक पात्र ठरणार
नाशिक जिल्हास्तरावर 'पशुसंवर्धन उपआयुक्त' हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या मोहिमेसाठी दूध सोसायटी, दूध संघ किंवा दूध उत्पादक कंपनीचे सभासद असलेले आणि अद्याप या योजनेचा लाभ न घेतलेले सर्व पशुपालक शेतकरी पात्र ठरणार आहेत.
हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर
