31 ऑक्टोबरचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2016 05:04 PM2016-10-21T17:04:43+5:302023-08-08T19:28:38+5:30

​जान्हवी सामंत

31st thunderstorms | 31 ऑक्टोबरचा थरार

31 ऑक्टोबरचा थरार

googlenewsNext
Release Date: October 21,2016Language: हिंदी
Cast: सोहा अली खान, वीर दास
Producer: हॅरी सचदेवाDirector: शिवाजी लोटण पाटील
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
न्हवी सामंत

चित्रपट म्हणून 31 ऑक्टोबरमध्ये काही विशेष लक्षवेधी नसले तरीही या चित्रपटाची राजकीय आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहाता याची नोंद घेणे गरजेचे आहे. 31 ऑक्टोबर, 1984 या दिवशी घडलेल्या सत्य परिस्थितीची संवेदनशील मांडणी ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात जी हिंसा पसरली होती, त्याचा दिल्लीतील एका सामान्य कुटुंबावर काय परिणाम झाला हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते.
31 ऑक्टोबर या चित्रपटात देविंदर सिंगच्या (वीर दास) आयुष्यात केवळ 24 तासात काय गोष्टी घडतात या दाखवण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रीसिटी बोर्डमध्ये काम करणाऱ्या देविंदरचा दिवस नेहमीप्रमाणेच सुरू होतो. गुरुद्वारमध्ये प्रार्थना केल्यानंतर दोन मुलांच्या शाळेची तयारी करून तो रोजसारखा कामाला जातो. ऑफिसमधील वातावरणदेखील नेहमीसारखेच असते. ऑफिसमधील अधिकाधिक जण क्रिकेटची कॉमेंट्री एेकण्यात व्यग्र असतात. त्याची पत्नी तेजिंदर (सोहा अली खान) घरातील सगळी कामे संपवून आपल्या लहान मुलीला सांभाळत असते. पण दुपारनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची बातमी येते. त्यांची हत्या ही त्यांच्याच शिख बॉडीगार्डने केली आहे ही बातमी संध्याकाळपर्यंत सगळीकडेच पसरते आणि लोक सगळ्याच शिखांच्या जीवावर उठतात. राजकीय नेतेदेखील या गोष्टीचा फायदा घेऊन लोकांच्या भावना अधिक भडकवतात आणि यामुळे सगळीकडे दंगली उसळतात. यात हजारो निष्पाप शिख लोकांची हत्या केली जाते.
लोकांना चाकू, काठ्या घेऊन फिरताना, सगळीकडे जाळपोळ करताना देविंदर आणि तेजिंदर पाहात असतात. अनेक शिख लोकांची हत्या केली जात असते. तसेच त्यांची घरे, दुकाने जाळली जात असतात, हा सगळा प्रकार पाहून ते दोघेही प्रचंड घाबरतात. या सगळ्या परिस्थितीत पोलिसदेखील काहीच करत नसतात. त्यामुळे आपला जीव धोक्यात असल्याचे देविंदरच्या कुटुंबियांच्या लक्षात येते आणि ते आपले घर सोडून, आपल्या परिसरातून पळून जाण्याचे ठरवतात. देविंदरचे मित्र पाल (दीप्राज राणा), टिळक (विनित शर्मा) आणि योगेश (लाखा लखविंदर सिंग) त्यांना मदत करायला हजर होतात. दंगल उसळलेली असताना कोणालाही ते शिख आहेत हे न समजू देता देविंदरचे कुटुंब कसा पळ काढतात हा या चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे.
1984च्या दंगलीला अनेक वर्ष झाली आहेत. या काळात आजसारख्या 24 तास प्रक्षेपित होणाऱ्या बातम्यांच्या वाहिन्या नव्हत्या. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांना का मारले गेले आणि त्यांच्या हत्येनंतर शिख लोकांवर काय अत्याचार झाले याची तितकीशी माहिती लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. या तुलनेत 1992ला मुंबईत झालेली दंगल अथवा 2002ची गुजरातमधील दंगल प्रसारमाध्यमांमुळे लोकांना चांगलीच माहीत आहे. 1984 ची दंगल झाल्यानंतरही काही दिवस तरी शिख लोकांवर अत्याचार होत होते एवढीच या दंगलीची आठवण आजच्या लोकांना आहे. दंगलपीडित लोकांच्या आठवणी आणि ऐकीव माहिती यामधूनच ही दंगल किती भयानक होती हे आपल्याला कळते. आजही अनेक कुटुंब त्या दिवशी घडलेल्या दंगलीच्या दहशतीखाली आहेत. आजपर्यंत लोकांनी ज्या दंगलीकडे दुर्लक्ष केले होते, त्या दंगलीवर हा चित्रपट प्रकाशझोत टाकतो. त्यामुळेच 31 ऑक्टोबर हा चित्रपट खूप महत्त्वाचा ठरतो.
परंतु एक चित्रपट म्हणून 31 ऑक्टोबर ही ऐतिहासिक कथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात पूर्णपणे अपयशी ठरतो. त्याचे पहिले कारण म्हणजे सोहा अली खान आणि वीर दास दोघेही आपल्या व्यक्तिरेखेत कर्म्फटेबल नाहीत. आपल्या घरात अथवा आपल्या मुलांसोबत खेळताना या दोघांच्या अभिनयात सहजता जाणवत नाही. सोहा तर लहान बाळासोबत खूपच अवघडल्यासारखी वाटते. लहान घरात लोक कसे वावरतात याची सोहा आणि वीर या दोघांनाही कल्पना नसल्याचे चित्रपट पाहाताना वाटते आणि त्यामुळेच चित्रपटाच्या पूर्वार्धात त्यांच्या घरातील वातावरण, त्यांचे कामकाज हे दाखवण्यात चित्रपट अपयशी ठरतो. चित्रपट पाहाताना आपण या गोष्टींशी जोडले जात नाही. कलाकारांना जर पूर्वार्धासाठी आपण दोषी ठरवत असू, तर मध्यांतरानंतरच्या चित्रपटासाठी दिग्दर्शकाला दोषी ठरवणे गरजेचे आहे.
तरीही मध्यांतरांनंतर चित्रपटात काही चांगल्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. रस्त्यावर सोहाने पाहिलेली दंगलीची दृश्ये अथवा चित्रपटात क्लायमॅक्सला उलगडलेले काही रहस्यमय क्षण या चित्रपटातील काही चांगल्या गोष्टी आहेत. पण चित्रपटात असे क्षण काही निवडकच आहेत. चित्रपटात अतिशय हिंसक आणि भीतीदायक दृश्य दाखवली गेली असली तरीही निर्मात्याला चित्रपटाच्या कथेवर तशी पकड बांधता आलेली नाही. चित्रपटात असणाऱ्या उपकथा चित्रपटात उगाचच घुसवल्यासारख्या वाटतात. देविंदरचे दम्यामुळे कोसळून पडणे हे चित्रपटात उगाचच दाखवले आहे. चित्रपटाची खरी समस्या म्हणजे निर्मात्यांनी दंगलीवर आपली कोणीतीही बाजू मांडलेली नाही. दंगल उसळू नयेत यासाठी पोलिस काहीही भूमिका बजावत नाहीत हे जरी चित्रपटात दाखवण्यात आले असले तरी या दंगलीतील राजकीय बाबींवर काहीही भाष्य करण्यात आलेले नाही.
अशाप्रकारचा विषय मांडण्यासाठी दिग्दर्शकाचे नक्कीच कौतुक करणे गरजेचे आहे. पण तरीही 31 ऑक्टोबरची मांडणी अधिक रंजक करता आली असती. 


Web Title: 31st thunderstorms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.