रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 04:31 PM2024-04-30T16:31:21+5:302024-04-30T16:32:36+5:30

Lok Sabha Election 2024 And Congress : अमेठी आणि रायबरेली या जागांवर कोण निवडणूक लढवणार हे काँग्रेसकडून अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Lok Sabha Election 2024 deepak singh says Rahul Priyanka Gandhi candidature from amethi raebareli will defeat BJP | रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी झालं असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी झालं. परंतु अमेठी आणि रायबरेली या जागांवर कोण निवडणूक लढवणार हे काँग्रेसकडून अद्याप स्पष्ट झालेलं नाही. उत्तर प्रदेश, रायबरेली आणि अमेठी या व्हीव्हीआयपी लोकसभा जागांसाठी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार यावर अजूनही सस्पेंस आहे. याचदरम्यान, काँग्रेस नेते दीपक सिंह यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

अमेठी आणि रायबरेलीमधून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीबद्दल विचारले असता, काँग्रेस नेते दीपक सिंह म्हणाले की, "आम्हा सर्वांना विश्वास आहे की राहुल गांधी, प्रियंका गांधी येतील आणि भाजपाचा पराभव करतील." एकीकडे सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यानंतर रायबरेलीमध्ये चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना याच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान दिलं आहे. 

काँग्रेस रायबरेलीतून कोणाला तिकीट देणार?

सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवल्यानंतर रायबरेलीमध्ये त्यांच्या जागी कोण निवडणूक लढवणार याची चर्चा रंगली होती. मात्र त्यांची जागा कोण घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रियंका गांधी यांना रायबरेलीतून रिंगणात उतरवण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

20 मे रोजी होणार मतदान 

अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जात होत्या, पण 2019 च्या निवडणुकीत स्मृती इराणींनी या जागेवर राहुल गांधींचा पराभव केला. तर काँग्रेसने या जागेवरील उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि या जागेवरूनही ते उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात असे मानले जात आहे. अमेठीमध्ये उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख तीन मे आहे. अमेठी मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. तर रायबरेलीच्या जागेवरही 20 मे रोजी मतदान होणार आहे.
 

Web Title: Lok Sabha Election 2024 deepak singh says Rahul Priyanka Gandhi candidature from amethi raebareli will defeat BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.