धर्मांध भाजपाला सत्तेबाहेर खेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:14 AM2019-04-11T00:14:42+5:302019-04-11T00:17:39+5:30

पंतप्रधानांचे काम असते देशातील शांतता, सौहार्द कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी जाती-धर्मात तेढ निर्माण करुन धर्मांधता वाढविण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत.

Fetch BJP frome power | धर्मांध भाजपाला सत्तेबाहेर खेचा

धर्मांध भाजपाला सत्तेबाहेर खेचा

googlenewsNext
ठळक मुद्देगुलाम नबी आझाद यांचे आवाहन काँग्रेसच्या पाठीशी रहा, हैदराबादी नेत्याला भुलू नका

नांदेड : पंतप्रधानांचे काम असते देशातील शांतता, सौहार्द कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी जाती-धर्मात तेढ निर्माण करुन धर्मांधता वाढविण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. त्यामुळे भाजपाच्या पराभवाचे प्रमुख ध्येय समोर ठेवून काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केले. बॅरिस्टर ओवेसींची वंचित आघाडी ही भाजपा सरकारलाच मदत करण्यासाठी उभी असल्याचे सांगत या हैदराबादी नेत्यालाही थारा देऊ नका, असे ते म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा. आझाद यांनी बुधवारी शहरातील पीरबुºहाणनगर आणि देगलूर नाका येथे प्रचारसभा घेतल्या. यावेळी मंचावर आ. डी.पी. सावंत, मालेगावचे आ. असिफ शेख, माजी महापौर अब्दुल सत्तार, सभापती फारुख अली खान, माजी सभापती मसूद खान, माजी उपमहापौर शफी अहेमद कुरेशी, अ‍ॅड. बारी सिद्दीकी, अ‍ॅड. निलेश पावडे, शमीम अब्दुल्ला, इब्राहीम इनामदार, तौफीक साब आदींची उपस्थिती होती.
कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे राजकारण जवळून पाहण्याची मला संधी मिळाली. निष्कलंक चारित्र्याचा धनी असलेल्या या नेत्याने आयुष्यभर धर्मनिरपेक्षता जोपासली. तीच विचारधारा खा. अशोकराव चव्हाण पुढे घेवून जात असल्याने खा. चव्हाणांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
विकासाची आश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजपाने मागील साडेचार वर्र्षात केवळ धर्मांधतेचे राजकारण केले. मुस्लिमधर्मीयांना जाणीवपूर्वक हीन वागणूक दिली. तसेच या समाजबांधवांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरही गदा आणली. याच सरकारने तीन तलाक सारखा अत्यंत चुकीचा कायदा आणला. या कायद्याविरुद्ध काँग्रेसच्या वतीने संसदेत आम्ही आवाज उठविला. पूर्वी या देशात सहिष्णुतेचे वातावरण होते. काँग्रेसच्या विचारधारेमुळे अठरापगड जातीत आपलेपणा होता. मात्र नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने या विचारधारेवरच हल्ला चढविला आहे. खा. असोद्दीन ओवेसी सारखी मंडळीही धर्मा-धर्मात तेढ पसरवून एक प्रकारे भाजपाला मदत करण्याचेच काम करीत आहेत. त्यामुळे भाजपाबरोबरच ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीलाही धडा शिकविण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.
राहुल गांधी यांची धोरणे स्पष्ट आहेत. देशाला विकासाकडे घेवून जाणारे युवा नेतृत्व उभे राहिले आहे. अशावेळी काँग्रेसला बळकटी दिल्यास आपले उद्याचे भविष्य उज्ज्वल राहील, असा विश्वासही गुलाम नबी आझाद यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून उपस्थितांना दिला.
मतविभाजनाचा भाजपाला फायदा नको
सर्वसामान्य अल्पसंख्याक समाजाचे जगणे मुश्किल करणाऱ्या भाजपाला सत्तेबाहेर खेचण्याचे उद्दिष्ट समोर ठेवा. आपली खरी लढाई फक्त धर्मांध भाजपा सरकारशी आहे. त्यामुळे ही लढाई लढताना धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार नाही आणि त्याचा फायदा पुन्हा भाजपाला मिळणार नाही, याची दक्षता घेण्याची आवश्यकता गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केली. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Web Title: Fetch BJP frome power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.