हृतिकला झालेय तरी काय?

By Admin | Published: August 31, 2016 02:11 AM2016-08-31T02:11:09+5:302016-08-31T02:11:09+5:30

बॉलीवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन सध्या अपयश आणि वादांच्या गर्तेत अडकला आहे. बऱ्याच कालावधीनंतर हृतिकचा ‘मोहेंजोदडो’ आला, पण आला तसाच बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला.

What happened to Hrithik? | हृतिकला झालेय तरी काय?

हृतिकला झालेय तरी काय?

googlenewsNext

बॉलीवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन सध्या अपयश आणि वादांच्या गर्तेत अडकला आहे. बऱ्याच कालावधीनंतर हृतिकचा ‘मोहेंजोदडो’ आला, पण आला तसाच बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. कदाचित त्याचमुळे हे अपयश हृतिकला पचवता आले नाही आणि त्याने या अपयशाचे खापर थेट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरवर फोडले. आशुतोषला असभ्य भाषेतला मेसेज पाठवण्यापर्यंतचा ‘अविवेक’ हृतिकने दाखवला आणि एका नव्या वादाला तोंड फोडले. त्या पूर्वी कंगनासोबतचा त्याचा ‘एपिसोड’ गाजला. या वादात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हृतिकऐवजी कंगनाची बाजू घेतली. याही वेळी कंगनाची बाजू घेणाऱ्यांवर राग काढून हृतिकने अविवेकीपणाचेच दर्शन घडवले. कंगना Asperger's Syndromeची रुग्ण असल्याचा बेछूट आरोप करून हृतिकने रोष ओढवून घेतला. एकंदर काय, तर हृतिकभोवतीचे वाद वाढू लागले आहेत... हे वाद पाहता, ‘हृतिकला झालेय तरी काय?’ असाच प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.


आशुतोष यांच्यासोबतचा वाद
‘मोहेंजोदडो’च्या अपयशासाठी जबाबदार कोण, यावरून दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि हृतिक यांच्यात सध्या एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘मोहेंजोदडो’चे टीजर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी चित्रपटाचे कौतुक केले होते. प्रेक्षकांची उत्सुकताही वाढली होती. प्रत्यक्षात मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावर धाडकन आपटला. अक्षयच्या ‘रुस्तुम’समोर तो टिकाव धरू शकला नाही. हृतिकने आशुतोषला वाईट भाषेत मेसेज करून याबाबत तूच कारणीभूत असल्याचे म्हटले, तर दुसरीकडे आशुतोषनेही त्याला त्याच भाषेत उत्तर देत अपयशाला तूच जबाबदार आहेस, असे सुनावले आहे. हृतिकने स्वत: ओढवून घेतलेला हा वाद आता विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.


कंगनावरचे बेछूट आरोप
हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यातील वाद कुणापासूनही लपून राहिलेला नाही. कंगनाने एका मुलाखतीत हृतिकला ‘सिली एक्स’ म्हटले आणि हृतिकने त्याचे उत्तर म्हणून कंगनाला कायदेशीर नोटीस बजावली. कंगनानेही कायदेशीर नोटीस धाडत, हृतिकला जशास तसे उत्तर दिले. यानंतर हृतिक व कंगना दोघेही एकमेकांवर बेछूट आरोप करताना दिसले. मीडियामध्ये याचे चर्वितचर्वण झाले. या कोल्डवॉरमध्ये अनेकांनी कंगनाला पाठिंबा देत, हृतिकला धोबीपछाड दिले आहे. कंगनाबद्दल हृतिकने लिहिलेले शब्द आणि तिच्यावर केलेले बेछूट आरोप सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारे असल्याचे मत अनेकांनी बोलून दाखवले. हृतिकने कंगनाच्या मानसिक आरोग्याबाबत भाष्य करीत, कंगना Asperger's Syndrome रुग्ण असल्याचा आरोप हृतिकने केला. यावरूनही हृतिक टीकेचा धनी ठरला.

कंगनाची बाजू घेणाऱ्यांवर संतापला हृतिक : कंगना व हृतिक या वादात बॉलीवूडमधील काही जण कंगनाच्या बाजूने उभे राहिले. कंगनाला पाठिंबा देणाऱ्या या अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींवर हृतिक नाराज असल्याच्या बातम्या आल्या. प्रियांका चोप्रा, विद्या बालन, रणवीर सिंग, रविना टंडन, सलमान खान, करण जोहर या सर्वांवर हृतिक नाराज असल्याचे कळते. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी हृतिकने प्रियांका, विद्या व करणला अतिशय हळवे मेसेज पाठवल्याचीही बातमी आली.

सुजैनसोबतचा घटस्फोट
‘काइट्स’ या चित्रपटात हृतिकच्या अपोझिट दिसली ती बार्बरा मोरी. याच ‘काइट्स’च्या शूटिंगदरम्यान बार्बरासोबतची हृतिकची जवळीक इतकी वाढली होती की, हृतिकची पत्नी सुजैन ही संतापाने आपल्या वडिलांकडे निघून गेली होती. अर्थात, कालांतराने हृतिक व सुजैन पुन्हा एकत्र आले, पण दुर्दैवाने या नात्यातील ‘दुरावा’ पुढे वाढतच गेला. बार्बरा मोरीसोबतच्या हृतिकच्या कथित अफेअरनंतर सुजैन व हृतिक यांच्यातील दुरावा वाढला. यानंतर, अचानक सुजैनने हृतिकसोबतचा १४ वर्षांचा संसार संपवण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटामागील कारणे अद्यापही जगासमोर आलेली नाहीत, पण यामागच्या अनेक कारणांची चर्चा मीडियात झाली. हृतिकच्या अफेअरला कंटाळून सुजैनने त्याला सोडल्याचे ऐकिवात आले, तसेच सुजैन व अर्जुन रामपाल यांच्यातील मैत्री या घटस्फोटाला कारणीभूत ठरली, असेही कानावर आले, पण भविष्यात मी व हृतिक कधीही एकत्र येणार नाही, असे सांगून सुजैनने हृतिकला कायमचे ‘एकाकी’ केले.


सलमानकडे दुर्लक्ष
काही महिन्यांपूर्वी स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये झालेल्या आयफा सोहळ्यात हृतिक व सलमान खानमधील कोल्ड वॉर चर्चेचा विषय ठरले. माद्रिदमध्ये झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मंचावर प्रत्येक कलाकार दिसला, पण हृतिकने या इव्हेंटला जाणे टाळले. अवॉर्ड फंक्शननंतर सलमानने त्याच्या रूममध्ये पार्टी दिली. या पार्टीलाही हृतिक गेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून हृतिक सलमानपासून फटकून वागतो आहे. हृतिक व कंगनाच्या वादात सलमानने कंगनाची बाजू घेतल्याचा राग हृतिकच्या मनात खदखदत असल्याचे मानले जात आहे. काही वर्षांपूर्वी हृतिक व ऐश्वर्याचा ‘गुजारिश’ हा सिनेमा आला होता. ‘हा सिनेमा कुत्रीसुद्धा पाहणार नाहीत,’ अशा शब्दांत सलमानने या चित्रपटाची टर उडवली होती. अर्थात, ‘मी असे काहीही म्हटले नव्हते,’ असा खुलासा सलमानने केला होता, पण कदाचित हा राग हृतिकच्या मनातून अद्यापही गेलेला दिसत नाही.

Web Title: What happened to Hrithik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.