प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 08:35 AM2024-05-10T08:35:50+5:302024-05-10T08:37:59+5:30

प्रियांका यांचे नशीब बदलले असावे. आता त्या पक्षाच्या स्टार कॅम्पेनर असून, जिथे जिथे जातात तिथे त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे!

Priyanka Gandhi finally entered the field! Wherever she go... | प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...

प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...

- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

प्रियांका गांधी वड्रा या शब्दशः अर्थाने काही महिन्यांपूर्वीपर्यंत राजकीय विजनवासात होत्या. त्यांना कोणतेही काम दिले गेलेले नसल्याने त्या अमेरिकेच्या खासगी दौऱ्यावर निघून गेल्या. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीस असूनही त्यांना काम असे कोणतेच नव्हते. त्यांचे बंधू राहुल गांधी मात्र ६७ दिवसांच्या ‘भारत जोडो न्याय’ यात्रेला गेले होते. तेलंगणातील काही काँग्रेसजनांनी प्रियांका यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली. परंतु तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 

एप्रिल महिन्याच्या अखेरीस राहुल गांधी यांना वाटले की, प्रियांका यांनी रायबरेलीतून लढावे. कारण केरळमधील वायनाडच्या जागेबद्दल ते निश्चिंत होते. पण तोवर खूप उशीर झालेला होता. पक्षाचे अध्यक्ष खरगे आणि इतरांच्या दडपणामुळे राहुल यांना मैदानात उतरावे लागले. प्रियांका यांचे नशीब बहुधा बदलले असावे. आता त्या पक्षाच्या स्टार कॅम्पेनर असून, त्या जिथे जिथे जातात तिथे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. सभांमध्ये बोलताना त्या भावुक होतात. आपल्या आजी इंदिरा गांधी आणि पित्याने केलेल्या त्यागाची आठवण त्या जमावाला करून देतात. बोलताना त्या नेहमी एक टिपण जवळ बाळगतात. त्यामुळे अडखळत नाहीत आणि जनसमुदायाशी स्वतःला जोडून घेऊ शकतात.

पंतप्रधानांचे घर तयार; ४ जूननंतर गृहप्रवेश
पंतप्रधानांचे नवीन निवासस्थान वेळेच्या आधीच बांधून पूर्ण झाले असून, पंतप्रधानांच्या प्रतीक्षेत आहे. दारा शुकोह मार्गावर राष्ट्रपती भवनाजवळ बांधण्यात आलेल्या या नव्या घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी लगेचच जाऊ शकले असते; परंतु त्यांनी औचित्याने भान राखून लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी थांबण्याचे ठरवले. ४ जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतात याची वाट पाहण्याचा त्यांचा मानस त्यामागे असावा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे पंतप्रधानांचे शेजारी. ते मात्र १५ एकरावरील भव्य प्रासादात  स्थलांतरित झाले आहेत.

पंतप्रधानांचे हे नवे निवासस्थान ४६७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आले असून, पंतप्रधानांचे कार्यालय, संसदेचे सभागृह आणि नवीन कार्यकारी कक्ष, उपराष्ट्रपतींचे निवासस्थान, अशा ठिकाणी जायला या घरातून बोगदा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी पंतप्रधानांना घेऊन जाताना सुरक्षेच्या कारणाने वाहतूक खोळंबा होत असतो. त्यावर हा पर्याय काढण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाहेरून कोणताही हल्ला झाला तरी या नव्या घरावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. २,२६,२३० चौरस फुटाचे हे बांधकाम असून, ३,६१,३२८ चौरस फूट एवढ्या क्षेत्रात ते उभे आहे. या योजनेत उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान अशा दोघांसाठीच्या घरांचा समावेश आहे. 

बिहारमधले बदलते वारे
चिराग पासवान यांनी २०२०च्या विधानसभा निवडणुकीत जे केले त्याची परतफेड बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आता करत आहेत, असे दिसते. चिराग पासवान यांचा लोकशक्ती पक्ष (रामविलास पासवान गट) हा लोकसभेच्या ४० पैकी पाच जागा लढवत आहे आणि त्याच्या पराभवासाठी नितीश कुमार यांनी कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. भाजप आणि संयुक्त जनता दल या दोन्ही पक्षांनी समजून उमजून गेल्या काही आठवड्यांपासून एकत्र प्रचार करणे सोडून दिले आहे.

मुस्लिमांमधील मागासवर्गीयांना राखीव जागा देण्याविरुद्ध भाजप उघडपणे बोलू लागला. निवडणूक प्रचारात मित्रपक्षाने अचानक घेतलेल्या या पवित्र्याने संयुक्त जनता दल अस्वस्थ झाले. भाजपच्या या पवित्र्यामुळे मुस्लीम मतदार ‘इंडिया गटा’कडे वळले. त्यामुळे नितीश कुमार यांची ताकत कमी झाली. दुसरे म्हणजे नितीशकुमार यांना चिराग पासवान यांचा हिशोब चुकता करावयाचा होता. संयुक्त जनता दल विधानसभा निवडणुकीत भाजपशी आघाडी करून ११५ जागांवर लढले. मात्र त्यांना केवळ ४३ जागा मिळवता आल्या. २४३ सदस्यांच्या सभागृहात भाजपने विक्रमी ७४ जागा जिंकल्या. सर्वाधिक जागा मिळणारा भाजप एकल पक्ष ठरला. त्यावेळी चिराग पासवान यांनी एनडीए बाहेर पडून ८० जागा लढवल्या. त्यातून नितीश कुमार यांचे मोठे नुकसान होईल हे त्यांनी पाहिले होते. त्यामुळे संयुक्त जनता दलाची कामगिरी अत्यंत वाईट झाली. अस्वस्थ नितीश कुमार यांनी पुढे भाजप सोडून इंडिया आघाडीशी घरोबा केला. या आघाडीचे ते राष्ट्रीय निमंत्रक झाले. 

भाजपने सर्व ४० लोकसभा मतदारसंघात चिराग पासवान यांच्याबरोबर आघाडी करून पुढे जायचे ठरवले. पंजाबमध्ये त्यांनी असेच केले होते. परंतु नितीश यांच्या मनात वेगळेच काही आले, आणि त्यांनी भाजपला संदेश पाठवला. अर्थातच त्या पक्षाने पुन्हा एकदा ‘पलटूराम’ यांना जवळ केले. संयुक्त जनता दलाचे सामान्य कार्यकर्ते याविरुद्ध होते. नेते मात्र अपरिहार्य वास्तवाची कडू गोळी गिळून का असेना, नितीशकुमार यांच्याबरोबर राहिले. नितीश कुमार पुन्हा त्यांच्या खेळी खेळू लागले. सर्व काही ठीक होईल या आशेवर भाजप मात्र अस्वस्थपणे बिहारमधील नुकसान पाहात आहे.

Web Title: Priyanka Gandhi finally entered the field! Wherever she go...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.