रांची : पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात आॅस्ट्रेलियाला पराभूत करण्याचे श्रेय खेळाडूंसह संघव्यवस्थापनालाही असल्याचे कोहलीने म्हटले. संघव्यवस्थापनाने खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असेही कोहली म्हणाला.
आॅस्ट्रेलियाच्या १८.४ षटकांतील ८ बाद ११८ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना भारताला विजयासाठी ६ षटकांत ४८ धावा फटकावण्याचे सुधारित लक्ष्य मिळाले होते. भारताने ३ चेंडू व ९ गडी राखून विजयी लक्ष्य गाठले. कोहलीने आपल्या गोलंदाजांची प्रशंसा करताना सांगितले, ‘ते एका लढतीत महागडे ठरू शकतात, पण त्यानंतर दमदार पुनरागमन करतात. भुवनेश्वर व जसप्रीत बुमराह यांनी गेल्या काही दिवसांपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगला मारा केला आहे. यॉर्कर व स्लोअरवन चेंडू टाकण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे फलंदाजाला चुका करण्यास भाग पाडण्याची कला असावी लागते.’
पत्नीच्या आजारपणामुळे वन-डे मालिकेतून माघार घेणाºया शिखर धवनने टी-२० मालिकेत पुनरागमन केले. त्याने नाबाद खेळी केल्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावेल, असे कोहली म्हणाला. कोहलीने सांगितले, ‘शिखर वन-डे मालिकेत खेळला नव्हता, पण टी-२० मध्ये त्याने पुनरागमन केले. नाबाद १५ धावांची खेळी केल्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावेल.’
टी-२० मध्ये प्रथमच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने अॅरॉन फिंचच्या महत्त्वाच्या विकेटबाबत सांगितले, ‘तो नक्की काय करीत आहे, याचा मी अभ्यास केला. त्यानंतर मी त्याला रिव्हर्स स्वीप खेळण्यास बाध्य केले. त्यामुळे त्याला बाद करता आले. प्रत्येक सामन्यागणिक माझा आत्मविश्वास उंचावत आहे.’ (वृत्तसंस्था)
मोठे लक्ष्यही गाठले असते : धवन
आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-२० लढतीत पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर विजय मिळवल्यानंतर भारताचा सलामीवीर शिखर धवनने लक्ष्य मोठे असते तरी गाठण्यात यशस्वी ठरलो असतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धवन म्हणाला, ‘आमच्यापुढे मोठे लक्ष्य नव्हते, पण या खेळपट्टीवर धावा फटकावणे सोपे नव्हते. तसे बघता मोठे लक्ष्य मिळाले असते तरी आम्ही विजय मिळवला असता.’
लक्ष्य छोटे असल्यामुळे अधिक खेळण्याची संधी मिळाली नाही, याबाबत विचारले असता धवन म्हणाला, ‘माझ्या सहकाºयाने (विराट कोहली) आक्रमक खेळी केली. वन-डे मालिकेतून बाहेर राहिल्यानंतर संघात आल्याबरोबर खेळण्याची संधी मिळाल्यामुळे आनंद झाला.’
कुलदीपचा मारा खेळताना मन विचलित झाले होते : फिंच
मनगटाच्या बळावर चेंडूला फिरकी देणा-या कुलदीप यादवचा मारा खेळताना मन विचलित झाल्यामुळे मी बाद झालो, अशी कबुली आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज अॅरॉन फिंचने दिली.
शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० लढतीत फिंच बाद झाल्यानंतर आॅस्ट्रेलियाचा डाव गडगडला. भारताने या लढतीत
डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर ९ गड्यांनी विजय मिळवला.
पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेप्रमाणे टी-२० क्रिकेटमध्येही फिंच फॉर्मात असल्याचे दिसून आले. त्याने या लढतीत ४२ धावा काढून बाद होण्यापूर्वी पाच वेळा स्वीपचा फटका खेळला, पण यादवच्या एका फुल लेंथ चेंडूवर तो चुकला व क्लीनबोल्ड झाला.