Nidahas Trophy 2018: भारताची अपयशी सलामी; श्रीलंकेचा पाच विकेट्स राखून विजय

अनुनभवी गोलंदाजी आणि कुचकामी नेतृत्वामुळे भारताला निदाहास चषक तिरंगी क्रिकेट मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 10:33 PM2018-03-06T22:33:18+5:302018-03-06T22:45:03+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lanka win by five wickets | Nidahas Trophy 2018: भारताची अपयशी सलामी; श्रीलंकेचा पाच विकेट्स राखून विजय

Nidahas Trophy 2018: भारताची अपयशी सलामी; श्रीलंकेचा पाच विकेट्स राखून विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देशिखर धवनची 90 धावांची खेळी व्यर्थ

कोलंबो  : अनुनभवी गोलंदाजी आणि कुचकामी नेतृत्वामुळे भारताला निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. शिखर धवनच्या 90 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 174 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या कुशल परेराने आक्रमक खेळी साकारत संघाला विजयासमीप पोहोचवले. थिसारा परेरा आणि दासुन शनाका यांनी अखेरच्या षटकांमध्ये भारताच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत श्रीलंकेला पाच विकेट्स राखून विजय मिळवून दिला. यावेळी श्रीलंकेचा अर्धशतकवीर कुशल परेराला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

भारताच्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला दुसऱ्याच षटकात कुशल मेंडिसच्या रुपात पहिला धक्का बसला. पण श्रीलंकेला या धक्क्यातून कुशल परेराने सहजपणे बाहेर काढले. परेराने शार्दुल ठाकूरच्या तिसऱ्यात षटकात तब्बल पाच चौकार आणि एका षटकाराची अतिषबाजी करत 27 धावांची वसूली केली. यानंतर परेराने भारतीय गोलंदाजांवर अंकुश ठेवण्याचे काम चोख बजावले. पण दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ मिळत नव्हती. परेरा आता श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार, असे वाटत असतानाच वॉशिंग्टन सुंदरने परेराला यष्टीरक्षक दिनेश कार्तिककरवी यष्टीचीत करत भारताला मोठे यश मिळवून दिले. परेराने 37 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 66 धावांची दमदार खेळी साकारली. परेरा बाद झाल्यावर उपुल थरंगा खेळपट्टीवर पाय रोवू पाहत होता. शार्दुलच्या 14व्या षटकातील पाचव्या चेंडूवर थरंगाचा झेल रिषभ पंतने सोडला, त्यावेळी थरंगा 12 धावांवर होता. पण या जीवदानाचा फायदा थरंगाला उचलता आला नाही. चहलने थरंगाला 17 धावांवर त्रिफळाचीत केले.

थरंगा बाद झाल्यावर थिसारा परेरा आणि दासुन शनाका हे दोन नवीन फलंदाज खेळपट्टीवर होते. यावेळी भारताला या दोघांवर अंकुश ठेवून विजय मिळवण्याची संधी होती. पण संघात अनुभवी गोलंदाज नसल्याचा फटका भारताला बसला. परेरा आणि शनाका यांनी दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दुशमंथा चमीराने पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर भारताचा कर्णधार रोहित शर्माला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. रोहितला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. रोहितनंतर फलंदाजीला आलेल्या सुरेश रैनाला फक्त एकाच धावेवर समाधान मानावे लागले. दुसऱ्याच षटकात भारताची 2 बाद 9 अशी दयनीय अवस्था झाली होती. पण या परिस्थितीतून शिखर धवनने संघाला बाहेर काढण्याची जबाबदारी चोख निभावली. धवनने यावेळी मनीष पांडेला आपल्या साथीला घेत तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. पांडेने 35 चेंडूंत 37 धावांची खेळी साकारली खरी, पण त्याच्या या खेळीत आत्मविश्वासाचा अभाव होता.

पांडे बाद झाल्यावरही धवनने आपले आक्रमण कायम ठेवले. सुरुवातीपासूनच धवनची सुरु झालेली फटक्यांची माळ 18व्या षटकापर्यंत कायम राहिली. आपल्या जोरकस फटक्यांच्या जोरावर धवनने श्रीलंकेच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. आपल्या दमदार फटक्यांच्या जोरावर धवनने 49 चेंडूमध्ये सहा चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 90 धावांची तडफदार खेळी साकारली. ट्वेन्टी-20 सामन्यांतील पहिले-वहिले शतक धवन झळकावेल, असे वाटत होते. पण यावेळी त्याचे शतक दहा धावांनी हुकले.

संक्षिप्त धावफलक
भारत  :  20 षटकांत 5 बाद 174 (शिखर धवन 90, मनीष पांडे 37; दुशमंथा चमीरा 2/33) पराभूत वि. श्रीलंका : 18.3 षटकांत 5 बाद 175 (कुशल परेरा 66, थिसारा परेरा नाबाद 22, वॉशिंग्टन सुंदर 2/28).
सामनावीर  : कुशल परेरा.
निकाल  : श्रीलंकेचा भारतावर पाच विकेट्स राखून विजय.

Web Title: Sri Lanka win by five wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.