बीसीसीआयचा भर ‘बेंच स्ट्रेंथ’वर

महिला क्रिकेटपटूंची मोठी फळी उभारण्याकडे लवकरच लक्ष देण्यात येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 04:42 PM2018-03-21T16:42:08+5:302018-03-21T16:42:08+5:30

whatsapp join usJoin us
Over the BCCI's 'Bench Strength' | बीसीसीआयचा भर ‘बेंच स्ट्रेंथ’वर

बीसीसीआयचा भर ‘बेंच स्ट्रेंथ’वर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाकडून एकदिवसीय चॅम्पियनशिप मालिका ३-० ने गमविल्यानंतर भारतीय क्रिकेट मंडळाने(बीसीसीआय) महिला क्रिकेटची ताकद वाढविण्याकडे लक्ष दिले आहे. महिला क्रिकेटपटूंची मोठी फळी उभारण्याकडे लवकरच लक्ष देण्यात येईल.

बीसीसीआयने महिला क्रिकेटमधील निवडकर्त्यांना वेगवान गोलंदाज, फिरकीपटू आणि यष्टिरक्षकांचा पूल तयार करण्याच्या सूचना दिल्या. या महिनाअखेर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सुरू होत असलेल्या शिबिरात सर्व खेळाडूंची प्रतिभा तपासली जाईल. मिताली राज आणि झुलन गोस्वामी कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. त्यांचा पर्याय शोधण्याचे आव्हान निवडकर्त्यांपुढे असेल. वेगवान गोलंदाज झुलन आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळू शकली नव्हती. मालिका ०-३ ने गमविल्यानंतर आता २८ मार्च रोजी पराभवाचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीला सीओए सदस्य डायना एडलजी, वन डे कर्णधार मिताली राज, टी-२० कर्णधार हरमनप्रीत कौर, निवड समिती प्रमुख हेमलता काला आणि समन्वयक प्रा. रत्नाकर शेट्टी आदी उपस्थित
राहतील.

बैठकीसंदर्भात एडलजी म्हणाल्या,‘आम्हाला चांगले वेगवान आणि फिरकी गोलंदाज हवे आहेत. आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत या बाबी चव्हाट्यावर आल्या. प्रतिस्पर्धी फलंदाजांनी आमच्या फिरकीपटूंना चांगलाच चोप दिला, तर आमचे फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांविरुद्ध चाचपडत राहिले. फलंदाजीतही आम्हाला अधिक आक्रमक होण्याची गरज आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये पायाभूत स्तरावर झालेला बदल आणि अंडर १६ गटाची भर पडल्यामुळे खेळाडूंचा लोंढा वाढणार यात शंका नाही. तथापि, ईशान्येकडील राज्यांसह चोहोबाजूंनी प्रतिभावान खेळाडू पुढे यावेत, असे बीसीसीआयला वाटते.’(वृत्तसंस्था)

पुढच्या पिढीला तयार होण्यास वेळ लागेल
आम्ही नुकताच भारत ‘अ’ संघाच्या दौऱ्याला सुरुवात केली असून गतवर्षी विश्वचषक स्पर्धा संपवून मायदेशी परतल्यानंतर ‘अ’ संघाची उभारणी झाली. यामुळे या संघांना तयार होण्यास काहीसा वेळ लागेल. पुढच्या पिढीतील खेळाडूंना तयार होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी लागेल. आमच्याकडे काही प्रतिभावान गुणवान खेळाडू आहेत, पण त्यांनी अधिकाधिक सामने खेळणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील एक किंवा दोन वर्षांमध्ये आपल्याकडे भारत ‘अ’कडून खेळणाºया चांगल्या खेळाडूंची फळी निर्माण होईल, अशी मला खात्री आहे. दक्षिण आफ्रिका दौ-यात संघाने चांगला खेळ केला. शिवाय तेव्हा तेथील परिस्थितीही वेगळी होती. वडोदरा येथे झालेल्या मालिकेत आॅस्टेÑलियाचा संघ प्रत्येक विभागात आमच्याहून सरस ठरला.
- मिताली राज, कर्णधार

देशांतर्गत क्रिकेटचा मजबूत पाया झाल्यानंतरच महिलांसाठी आयपीएलसारखी स्पर्धा आयोजित करणे योग्य ठरेल, असे सांगताना मिताली म्हणाली, ‘आयपीएलसारख्या लीग खेळण्यासाठी खेळाडूंची एक फळी होणे जरुरी आहे. आधीच आपल्या ‘अ’ संघात गुणवान खेळाडूंची कमतरता भासत आहे. त्यामुळे एकदा का आपल्याकडे खेळाडू तयार झाले, की त्यानंतरच महिलांची लीग आयोजित करणे योग्य ठरेल.’

Web Title: Over the BCCI's 'Bench Strength'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.