थंडीच्या दिवसांत चपाती, पुरी असे पदार्थ खाण्यापेक्षा शरीराला उष्णता देण्यासाठी भाकरी खाण्याला प्राधान्य दिले जाते. बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी त्यासोबत झुणका, पालेभाजी किंवा चटणी असेल तर उत्तम बेत होतो पण भाकरी नेमकी कधी खावी असा प्रश्न अनेकाना पडतो काहीजणांना एक वेळच्या जेवणात भातच लागतो भात खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही. थंडीत भाकरी खाण्याचं महत्व आणि वेळेबाबतची ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. (Which Is Right Time to Eat Bhakri)
हिवाळ्यात भाकरी खावी असं का म्हणतात?
आयुर्वेदानुसार आणि पोषणशास्त्रानुसार बाजरी ही उष्ण गुणधर्माची असते. थंडीत शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीराला उब मिळावी यासाठी बाजरीची भाकरी गुणकारी ठरते. बाजरीमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे इम्युनिटी वाढते.
भाकरी दुपारी खावी की रात्री?
तज्ज्ञांच्यामते भाकरी खाण्याची वेळ तुमच्या पचनशक्तीवर आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. दुपारच्या वेळी आपली पचनशक्ती सर्वात चांगली असते. बाजरी किंवा ज्वारीची भाकरी पचायला थोडी जड असते. त्यामुळे दुपारी खाणं सर्वात उत्तम मानले जाते. दुपारी भाकरी खाल्ल्यानं शरीराला दिवसभर काम करण्यासाठी भरपूर उर्जा मिळते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही.
जर तुम्ही रात्री लवकर जेवत असाल संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान आणि जेवणानंतर थोडं चालत असाल तर रात्री भाकरी खाण्यास हरकत नाही. मात्र रात्री उशिरा जेवणाऱ्यांनी बाजरीची भाकरी टाळलेलीच बरी. कारण ती पचायला जड असल्यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. तसंच रात्री ज्वारीची भाकरी खाणं हा एक हलका आणि चांगला पर्याय ठरू शकतो.
भाकरीसोबत काय खावे?
भाकरीसोबत तूप किंवा गुळाचा खडा खावा. यामुळे भाकरीचा कोरडेपणा कमी होतो. मेथी,शेपू यांसारख्या पालेभाज्या खाणं अधिक चांगलं ठरतं. थंडीत अति प्रमाणात बाजरी खाऊ नये कारण यामुळे उष्णतेचे विकार होऊ शकतात. दिवसातून एकदा भाकरी खाणं पुरेसं आहे. जर तुम्हाला पचनाचा कोणताही त्रास नसेल तर तुम्ही दुपारी किंवा रात्री कधीही भाकरी खाल्ली तरी चालेल.
