Join us

रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:15 IST

रात्री लवकर जेवल्याने वजन कसं कमी होऊ शकतं आणि त्यामागील खरं कारण काय आहे? हे जाणून घेऊया...

दैनंदिन जीवनात आपल्यापैकी बरेच जण रात्रीचं जेवण कधी रात्री ९ वाजता तर कधी १०, ११ नंतर करतात. पण वजन वाढलं की आपण नेमके कुठे चुकतोय? असा प्रश्न हमखास पडू लागतो. तुम्हाला माहिती आहे का, वजन कमी करण्यासाठी रात्री लवकर जेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही फक्त "डाएट टिप" नाही, तर त्यामागे वैज्ञानिक आधार आणि आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला आहे. काही लोकांना वाटतं की वेळेचा फारसा फरक पडत नाही, परंतु सत्य पूर्णपणे वेगळं आहे. रात्री लवकर जेवल्याने वजन कसं कमी होऊ शकतं आणि त्यामागील खरं कारण काय आहे? हे जाणून घेऊया...

शरीराचं बायोलॉजिकल घड्याळ समजून घ्या

आपल्या शरीरात एक नैसर्गिक घड्याळ असतं, ज्याला "सर्केडियन रिदम" म्हणतात. हे घड्याळ आपल्या खाण्याच्या, झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेवर नियंत्रण ठेवतं. जर आपण या घड्याळानुसार, रात्रीचं जेवण लवकर म्हणजेच ८ वाजेपर्यंत केलं तर आपली पचनसंस्था चांगलं काम करते आणि फॅट स्टोर केलं जात नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

 

रात्री उशिरा जेवण

जर तुम्ही रात्री १० किंवा ११ वाजता जेवलात तर शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. झोपल्यानंतर लगेचच पचन मंदावतं आणि शरीरात चरबी म्हणून अन्न जमा होऊ लागतं. यामुळे हळूहळू वजन वाढतं आणि लठ्ठपणा एक मोठी समस्या बनू शकते.

लवकर जेवल्याने झोप चांगली लागते

जेव्हा तुम्ही वेळेवर जेवण करता तेव्हा झोपताना तुमच्या शरीराला हलकं वाटतं. यामुळे गाढ झोप येते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. चांगली झोप वजन कमी करण्यास खूप मदत करते, कारण ती हार्मोनल संतुलन राखते.

 

पोटाला विश्रांती मिळते

लवकर जेवल्याने तुमचं पोट देखील तुमच्यासोबत आनंदी राहतं. अपचन, गॅस आणि जडपणासारख्या समस्या उद्भवत नाहीत, ज्यामुळे दुसऱ्या दिवशीही ताजेतवानं वाटतं. यासोबतच तुम्ही सकाळी लवकर उठून व्यायाम किंवा योगा करू शकता, ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान होते.

रिसर्च काय म्हणतो?

अनेक रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, जे लोक संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी जेवण करतात त्यांचं मेटाबॉलिज्म वेगाने होतं आणि त्यांचं वजन इतरांपेक्षा लवकर कमी होतं. याशिवाय इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते, ज्यामुळे मधुमेहासारख्या आजारांचा धोका देखील कमी होतो.

 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्सअन्न