सतत वाढत जाणारं वजन कमी करणं ही आजच्या काळात एक मोठी समस्याच झाली आहे. जिममध्ये तासंतास घाम गाळणे किंवा कडक डाएट करून स्वतःला उपाशी ठेवणे प्रत्येकालाच जमते असे नाही. अनेकदा खूप प्रयत्न करूनही वजन काट्यावरील आकडा हलण्याचं नाव घेत नाही. अशावेळी गरज असते ती एका 'स्मार्ट फॉर्म्युल्याची' जो वेटलॉस करण्यासाठी मदत करेल(3-3-3 Weight Loss Formula).
बरेचदा वेटलॉस करण्यासाठी कितीही डाएट प्लॅन फॉलो केले, जिम जॉइन केलं तरीही हवा तसा बदल दिसत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. खरंतर वजन कमी करण्यासाठी फक्त उपाशी राहणं किंवा कडक डाएट करणं गरजेचं नाही, तर योग्य पद्धतीचा आणि सोपा असा एक खास फॉर्मुला फॉलो करणं महत्त्वाचं आहे. जिम, डाएट करूनही जर वजन कमी होत नसेल तर, '३-३-३ चा वेट लॉस फॉर्म्युला' (healthy weight loss formula 3-3-3) आपल्या शरीराच्या गरजेनुसार काम करतो, चयापचय क्रियेचा वेग सुधारतो आणि हळूहळू नैसर्गिक पद्धतीने वेटलॉस करण्यात मदत करतो. विशेषतः अशा लोकांसाठी हा फॉर्म्युला फायदेशीर आहे जे मन मारुन डाएट आणि हेव्ही एक्सरसाइजला कंटाळले आहेत.
प्रसिद्ध हेल्थ कोच सिमरुन चोप्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून वेटलॉससाठीचा ३-३-३ चा फॉर्म्युला (simple weight loss rules 3-3-3) शेअर केला आहे. आपल्या रोजच्या डेली लाईफस्टाईलमध्ये, तीन साध्यासोप्या सवयी स्वतःला लावून लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. वेटलॉस करण्यासाठी '३-३-३ चा फॉर्म्युला' ही पद्धत नेमकी कशी काम करते आणि तिचे तीन प्रमुख घटक कोणते आहेत ते पाहूयात...
३-३-३ चा वेट लॉस फॉर्म्युला म्हणजे नेमकं काय ?
३-३-३ चा वेटलॉस फॉर्म्युला ही वजन कमी करण्याची एक सोपी, शिस्तबद्ध आणि नैसर्गिक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये तीन वेळचे संतुलित व योग्य आहार, तीन चांगल्या सवयी आणि तीन गोष्टी टाळणे या मुख्य घटकांवर भर दिला जातो. ही पद्धत फक्त वजन घटवण्यासाठीच फायदेशीर नाही, तर आपली लाईफस्टाईल देखील आरोग्यदायी करण्यास मदत करते. योग्य आहार, चांगल्या सवयी आणि अपायकारक गोष्टींपासून दूर राहिल्यामुळे शरीराचा चयापचय क्रियेचा वेग सुधारतो आणि वजन हळूहळू पण नैसर्गिक पद्धतीने कमी होण्यास मदत होते.
वर्षभरात केस इंचभरही वाढत नाही? 'असा' करा पोटली मसाज - केस वाढतील भरभर, सांभाळण होईल कठीण...
३-३-३ चा वेटलॉस फॉर्म्युला...
१. तीन वेळचे संतुलित जेवण :- या पद्धतीनुसार, आपल्याला दिवसातून तीन वेळा संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. प्रत्येक जेवणात प्रथिने, फायबरयुक्त कर्बोदके, हेल्दी फॅट्स अशा तीन घटकांचा समावेश असावा, ज्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळते. प्रत्येक जेवणात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असावा. उदा. डाळी किंवा कडधान्ये यामुळे शरीरातील स्नायूंची ताकद वाढते. आहारात फायबरसाठी पालेभाज्या, फळे किंवा संपूर्ण धान्याचा (जसे की बाजरी, ज्वारी) समावेश करा. यामुळे पचन सुधारते. शरीरासाठी आवश्यक असलेले हेल्दी फॅट्स सुकामेवा किंवा ऑलिव्ह ऑइलचा समावेश आहारात करा. अशा संतुलित आहारामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. परिणामी, बराच वेळ भूक लागत नाही, पोट भरलेले वाटते आणि आपण 'ओव्हरईटिंग' करणे टाळता.
२. तीन महत्त्वाच्या सवयी स्वतःला लावा :- वजन कमी करताना फक्त आहार बदलून चालत नाही, तर या ३ सवयी आपल्या लाईफस्टाईलचा भाग असणे गरजेचे असते. दिवसातून तीन वेळा जेव्हाही जेवाल, त्यानंतर लगेच १५ ते २० मिनिटे चालावे. यामुळे रक्तातील ग्लुकोज स्नायूंपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. यासोबतच, दररोज किमान २ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्यामुळे केवळ 'मेटाबॉलिझम'चा वेग वाढत नाही, तर लागलेली तहान आणि भूक यातील फरक समजण्यास मदत होते. अनेकदा आपल्याला तहान लागलेली असते, पण आपण तिला भूक समजून काहीतरी खातो; पुरेसे पाणी प्यायल्यास ही समस्या दूर होते. रात्रीची ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. झोप पूर्ण झाल्यामुळे शरीरातील भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स संतुलित राहतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
३. या ३ गोष्टींपासून दूर राहा :- जेवण करताना आपले पूर्ण लक्ष अन्नावरच असायला हवे. मोबाईल किंवा टीव्ही पाहत जेवल्यामुळे आपले लक्ष भरकटते आणि शरीराला पोट भरल्याचा संकेत मिळत नाही. यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त म्हणजेच 'ओव्हरईटिंग' करतो. शक्यतो रात्रीचे जेवण ८ वाजेपूर्वी करुन घ्या. रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीराची पचनशक्ती मंदावते आणि त्याचा झोपेच्या गुणवत्तेवरही वाईट परिणाम होतो. सोडा, कोल्ड ड्रिंक्स किंवा पॅकेटमधील फळांचे रस पिणे टाळा. यामध्ये फक्त साखर आणि कॅलरीज असतात, ज्या शरीरात चरबी वाढवण्याचे काम करतात. त्याऐवजी ताजी फळे खाण्यावर अधिक जास्त भर द्या.
संतुलित आहार, नियमित हालचाल, एक्सरसाइज आणि पुरेशी झोप हे वजन कमी करण्याचे तीन मुख्य सूत्र आहे. आहारतज्ज्ञांच्या मते, वजन कमी करताना कोणत्याही कडक डाएटपेक्षा 'सातत्य' (Consistency) अधिक महत्त्वाचे असते आणि ही पद्धत पूर्णपणे नैसर्गिक असल्याने वजन कमी करणे सहजसोपे होते.
