आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पॅकेटबंद अन्न आपल्या रोजच्या आहाराचा भाग होत चालले आहे. बिस्किटांपासून सॉसपर्यंत, ब्रेडपासून रेडी-टू-ईट पदार्थांपर्यंत सगळं काही सहज उपलब्ध असलं तरी या सोयीमागे एक महत्त्वाचा घटक लपलेला असतो तो म्हणजे प्रिझर्वेटीव्ह्स. (Without even knowing it, you are consuming poison every day. 'These' foods are 100% causes constant illness!)जसं कृत्रिम स्विटनरबाबत आज लोक सावध झाले आहेत, तसंच प्रिझर्वेटीव्ह्सबाबतही जागरुक होण्याची गरज आहे, कारण परिणाम दिसायला उशीर लागतो, पण शरीरावर होणारा प्रभाव खोलवर असू शकतो.
प्रिझर्वेटीव्ह्स म्हणजे असे घटक जे अन्न लवकर खराब होऊ नये यासाठी वापरले जातात. अन्नामध्ये बुरशी, जंतू किंवा जीवाणू वाढू नयेत, त्याची चव, रंग आणि वास दीर्घकाळ टिकून राहावा यासाठी हे पदार्थ मिसळले जातात. घरचं अन्न काही दिवसांत खराब होतं, पण बाजारातलं पॅकेटबंद अन्न महिने-महिने टिकतं, याचं मुख्य कारण प्रिझर्वेटीव्ह्स असतात. अन्नाची वाहतूक लांब पल्ल्यावर करायची असल्याने आणि साठवणूक जास्त काळासाठी करावी लागते म्हणून अन्न उद्योगात त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मे-मध्ये काढलेल्या आंब्याचा रस वर्षभर मिळतो कारण त्यात हे प्रिझर्वेटीव्ह्स घातले जातात.
प्रिझर्वेटीव्ह्स दोन प्रकारचे असतात, नैसर्गिक आणि कृत्रिम. पारंपरिक स्वयंपाकात वापरले जाणारे मीठ, साखर, तेल, व्हिनेगर, लिंबाचा रस हे नैसर्गिक प्रिझर्वेटीव्ह्स आहेत. त्यामुळेच लोणची, सुकवलेले पदार्थ किंवा मीठात मुरलेले पदार्थ कायमच टिकतात. मात्र आधुनिक पॅकेटबंद अन्नामध्ये प्रामुख्याने कृत्रिम प्रिझर्वेटीव्ह्स वापरले जातात. रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेले हे घटक अगदी कमी प्रमाणात वापरले तरी अन्न बराच काळ टिकवून ठेवतात.
समस्या तिथे सुरु होते जिथे हे कृत्रिम प्रिझर्वेटीव्ह्स रोजच्या आहारातून नकळत शरीरात जात राहतात. एकाच वेळी ते घातक वाटत नाहीत, कारण प्रमाण कमी असतं. पण दिवसभरात बिस्किटं, ब्रेड, सॉस, थंड पेये, तयार स्नॅक्स असे अनेक पदार्थ खाल्ले गेले, तर या सगळ्यांमधून थोड्या-थोड्या प्रमाणात प्रिझर्वेटीव्ह्स शरीरात जमा होत जातात. हीच गोष्ट स्विटनरबाबत होते. एकदा थोडं चालेल असं वाटतं, पण सतत वापर झाल्यावर परिणाम जाणवायला लागतात.
काही लोकांमध्ये प्रिझर्वेटीव्ह्समुळे पचनाशी संबंधित तक्रारी, अॅसिडिटी, पोट फुगणं किंवा अपचन दिसू लागतं. संवेदनशील लोकांमध्ये त्वचेवर पुरळ, खाज किंवा अॅलर्जीची लक्षणं जाणवू शकतात. मुलांच्या बाबतीत काही वेळा पोटदुखी किंवा लक्ष न लागणं अशी लक्षणंही आढळतात. हे परिणाम लगेच दिसत नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, पण दीर्घकाळ सतत खात राहील्यास शरीरावर अतिरिक्त ताण पडू शकतो. म्हणूनच प्रिझर्वेटीव्ह्स पूर्णपणे वाईट आहेत असं म्हणण्यापेक्षा, त्यांचा अतिरेक हानिकारक ठरु शकतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आजच्या काळात ते पूर्णपणे टाळणं अवघड असलं तरी निवड आपल्या हातात आहे.
