स्वयंपाक करताना मिरची चिरणे, वाटण करणे किंवा लसूण सोलणे ही रोजची कामे असतात. एखादा तिखट पदार्थ चिरताना किंवा सोलताना बोटांना आणि नखाला जरा वेदना होतात. जास्त वेळ तसेच राहीले तर आग व्हायला लागते. विशेषतः हिरवी मिरची किंवा तिखट मिरची हातात घेतली तरी बोटांना जळजळ, चुरचुर किंवा उष्णता जाणवते. काही वेळा हा त्रास इतका वाढतो की हात धुतल्यानंतरही बराच वेळ बोटे झोंबतात. (fingers burning after cutting chillies? try 4 simple home remedies
)बोट चेहऱ्याला लागलं तर मग चांगलीच आग होते. मिरचीमध्ये असणाऱ्या कॅप्सेसिन या घटकामुळे त्वचेवर ही जळजळ जाणवते. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात.
बोटांची आग कमी करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे थंड पाण्यात बोटं बुडवणे. मिरची चिरल्यानंतर किंवा वाटण केल्यानंतर लगेच काही मिनिटे बोटं थंड पाण्यात ठेवली तर त्वचेला थंड वाटते. त्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते. गरज वाटल्यास दोन-तीन वेळा पाणी बदलून पुन्हा बोटं बुडवली तरी बरे वाटते. पाण्यात बर्फाचे तुकडेही टाकतात, त्यामुळे थंडावा अधिक जाणवतो.
दुसरा सोपा उपाय म्हणजे दूध किंवा दही वापरणे. मिरचीतील तिखटपणा कमी करण्यासाठी दूध खूप उपयुक्त मानले जाते. थोडे दूध किंवा दही बोटांवर लावून हलकेच चोळावे आणि दोन-तीन मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर साध्या पाण्याने हात धुवावेत. यामुळे बोटांची जळजळ कमी होते आणि त्वचेलाही बरे वाटते.
तिसरा उपाय म्हणजे तूप किंवा खोबरेल तेल लावणे. मिरचीतील तिखट घटक तेल लावल्यावर वेदना देत नाहीत. त्यामुळे बोटांवर थोडे तूप किंवा नारळाचे तेल लावून हलकेच चोळले तर जळजळ कमी होण्यास मदत होते. दोन-तीन मिनिटे तेल लावून ठेवल्यानंतर हात साबणाने धुतले तर बोटे मऊ राहतात आणि आगही कमी होते.
चौथा उपाय म्हणजे कोरफडीचा गर (अॅलोव्हेरा जेल) लावणे. कोरफड त्वचेला थंडावा देण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी ओळखली जाते. कोरफडीचा ताजा गर बोटांवर लावून काही मिनिटे ठेवला तर त्वचेवरील उष्णता कमी होते आणि जळजळ कमी होते. हा उपाय विशेषतः संवेदनशील त्वचेसाठीही सुरक्षित मानला जातो. याशिवाय मिरची चिरताना किंवा लसूण सोलताना काही साधी काळजी घेतली तर बोटांची आग होण्याचा त्रास कमी होऊ शकतो.
