आपल्या घरात अजूनही मोठी माणसं जेवताना बोलू नये असं सल्ला देतात. पण बरेच लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. घरात असो किंवा बाहेर बरेच लोक गप्पा मारत जेवणं पसंत करतात. शांत बसून जेवणारा एकही जण दिसून येत नाही. पण खरा जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही शांत बसूनच जेवायला हवं. बोलता बोलता जेवल्यानं बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. जसं की पचनासंबंधीत समस्या बऱ्याच उद्भवतात. (4 reasons why not to talk while eating)
जेवतेवेळी बोलायचं का नसतं?
जेवताना शांत राहणे आणि न बोलता जेवण करणे ही फक्त एक शिस्त नसून विज्ञानाच्या दृष्टीनं त्याचे आरोग्याला बरेच फायदे आहेत. जेव्हा आपण शांतपणे जेवतो तेव्हा आपलं पूर्ण लक्ष अन्नावंर असतं. जेवताना का बोलू नये, शांतपणे जेवल्यानं काय फायदे होतात याबाबत आहारतज्ज्ञ श्रेया गोयल यांनी आपल्या इंस्टाग्राम हँण्डलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
त्या सांगतात की जेवणाची पचनक्रिया तोंडापासून सुरू होते. जेव्हा आपण बोलतो तेव्हा जेवण कमी चावतो ज्यामुळे अन्न व्यवस्थित चावलं जात नाही आणि पोटात व्यवस्थित पोहोचत नाही. असा स्थितीत कमी अन्न चावल्यामुळे ब्लॉटींग, गॅस, एसिडिटी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
जेवताना जास्त बोलल्यानं पोटात अन्नासोबत हवा पण जास्त भरली जाते. परिणामी ढेकर जास्त येतात. याव्यतिरिक्त अन्न घशात अडकण्याची शक्यता जास्त असते. आपल्या मेंदूला पोट भरलं आहे असा संदेश मिळायला साधारण २० मिनिटं लागतात. शांतपणे चावून खाल्ल्यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त जेवत नाही. बोलण्याच्या नादात आपण किती आणि काय खातोय याकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
आहारतज्ज्ञांच्यामते जेवताना बोलल्यामुळे नर्व्हस सिस्टिम गोंधळात पडते कारण मेंदूला एकत्र २ गोष्टी कराव्या लागतात जेवण चावण्यासोबत, बोलण्याकडेही लक्ष द्यावं लागतं. अशात तुम्ही अन्न व्यवस्थित चावलं नाही तर पचनाशी संबंधित समस्याही उद्भवतात.
शांतपणे जेवण्याचे बरेच फायदे आहेत. याव्यतिरिक्त लाळेचा फ्लो व्यवस्थित राहतो. अन्न पचायला मदत होते. शरीरातील पोषक तत्व व्यवस्थित शोषली जातात. मेटाबॉलिझ्म वेगानं होतो. तसंच जेवल्यानंतर पोटाला हलकं वाटतं आणि पचनक्रियाही चांगली राहते.
