आंब्याला फळांचा राजा म्हणतात. वर्षातून एकदाच मिळतो, चव म्हणजे स्वर्ग सुखच. त्यामुळे जेवढा खाता येईल तेवढा मन आणि पोट भरुन आंबा आपण खातो. उन्हाळा आला की आंब्याचा सुगंध आणि चव सगळ्यांनाच मोहात पाडते. पण 'आंबा उष्ण असतो' ही गोष्टही तितकीच खरी. काही जणांना आंबा खलल्यानंतर अंगावर पुरळ येणे, तोंडात फोड येणे, अॅसिडिटी वाढणे किंवा अंगात उष्णता जाणवणे असे त्रास होऊ शकतात. (Remember 5 tips while eating mangoes - it wont harm your digestion )सगळ्यात त्रासदायक म्हणजे गळू. आंबा जास्त खाल्ला तर गळू होतं. मात्र आंबा खाताना थोडी काळजी घेतली तर त्याचा आनंदही घेता येतो आणि त्रासही टाळता येतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबा खाण्यापूर्वी तो काही वेळ पाण्यात भिजत ठेवणे. साधारण अर्धा ते एक तास आंबे पाण्यात ठेवल्यास त्यातील उष्णता कमी होण्यास मदत होते, कोकणात घरोघरी हा उपाय केला जातो. तसेच त्यावरील रसायनांचे अंशही काही प्रमाणात निघून जातात. आंब्यावर फवारणी केली जाते, त्यातील रसायने निघून जातात.
आंबा नेहमी मर्यादेत खाणे गरजेचे आहे. खूप जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्यास शरीरात उष्णता झपाट्याने वाढते. विशेषतः लहान मुलांनी आणि ज्यांना आधीच उष्णतेचा त्रास होतो त्यांनी प्रमाणावर नियंत्रण ठेवावे. आंबा खाताना एकदा भरपूर खाऊ नका. सकाळी एक दुपारी किंवा संध्याकाळी एक असे खा. म्हणजे पचनाला त्रास होणार नाही.
आंब्यासोबत थंड प्रकृतीचे पदार्थ घेतल्यास उष्णतेचा परिणाम कमी होतो. उदाहरणार्थ, आंबा खाल्ल्यानंतर दूध पिणे, ताक घेणे किंवा पाण्याचे प्रमाण वाढवणे उपयोगी ठरते. मात्र आंबा खाल्यावर लगेच काही काही वेळाने. काही ठिकाणी आंबा खाल्ल्यावर थोडे तूप खाण्याचीही पद्धत आहे, जी शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करते. तसेच आमरसात थोडं तूप घातलं की आंबा बाधत नाही. त्याच प्रमाणे काळीमिरी पूड घातली तरी आंबा बाधत नाही.
रिकाम्या पोटी आंबा खाणे टाळावे. त्यामुळे अॅसिडिटी वाढू शकते आणि पोटात जळजळ होऊ शकते. जेवणानंतर किंवा मधल्या वेळेत आंबा खाणे अधिक योग्य ठरते. ज्यांना पिंपल्स, त्वचेवर पुरळ किंवा तोंडात फोड होण्याची समस्या असते त्यांनी आंबा खाताना अधिक काळजी घ्यावी. अशा वेळी आंब्याचे प्रमाण कमी ठेवणे आणि शरीराला थंडावा देणारे पदार्थ अधिक घेणे फायदेशीर ठरते.
तसेच, बाजारात मिळणारे कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे टाळावेत. शक्यतो नैसर्गिकरीत्या पिकलेले आंबेच निवडावेत, कारण रसायनांचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. एकंदरीत, आंबा हा पौष्टिक आणि चविष्ट फळ आहे, पण योग्य पद्धतीने आणि मर्यादेत खाल्ल्यासच त्याचे खरे फायदे मिळतात. थोडी काळजी घेतली तर आंब्याचा हंगाम मनसोक्त आनंदाने उपभोगता येतो.
