भारतीय पदार्थ एकदम मस्त असतात यात काही वाद नाही. लहानपणी शाळेतून घरी आल्यावर काही तरी खाऊ हवा असायचा तेव्हा आई गॅसवर पटकन तळणी ठेवायची आणि काही पदार्थ तळून त्यावर तिखट, मीठ भुरभुरायची. तोच आपला खाऊ असायचा. (monsoon special fried food, eat these Indian snacks , tasty and easy to make)आजकाल बाजात मिळणारे रेफ्रिजरेट केलेले पदार्थ लहान मुले आवडीने खातात. मात्र जुने ते सोने. विविध चवींचे आणि पदार्थांचे मिश्रण केलेले तळणीचे पदार्थ आजकाल जास्त पाहायला मिळत नाहीत. आपले भारतीय तळणीचे पदार्थ चविष्ट, कुरकुरीत आणि विविधतेने परिपूर्ण असतात.
साबुदाण्याची चकली हा पदार्थ खाताना भानच नाही उरायचे. साबुदाण्याची चकली उपासालाही केली जाते. डब्यात खाऊ म्हणून घेऊन जायलाही हा पदार्थ मस्त आहे. चकली तळल्यावर एकदा कागदाने टिपायची तेल काढून टाकायचे. म्हणजे जास्त तेलकट लागत नाही.
तांदळाच्या तसेच गव्हाच्या कुरडया आता सणा- समारंभांमध्ये खाल्या जातात. काम करताना, गप्पा मारत असल्यावर काही तरी चटरफटर खायची इच्छा होते त्यावेळी खाण्यासाठी हा पदार्थ एकदम मस्त आहे.
पिवळ्या रंगाच्या नळ्या शाळेच्या बाहेर एक रुपयाला मिळायच्या. त्याच आई घरी पोटभर तळायची. पाच बोटांमध्ये पाच नळ्या आडकवून खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे.
भात, खिचडी अशा पदार्थांसोबत तोंडीलावणे म्हणून छान तळलेली सांडगी मिरची दह्यात कालवायची. विविध प्रकारच्या मिरची बाजारात मिळतात. घरीही करु शकता. चवीला फार छान असते. जास्त तिखटही लागत नाही. दोन घास खिचडी जास्तच जाते.
पापड तर घरोघरी खाल्ले जातात. अनेक प्रकारचे पापड असतात. उडदाचे पापड, साबुदाण्याचे पापड, मिरगुंड , डाळींचे पापड, तांदूळाचे पापड, बटाटा पापड अनेक प्रकार असतात. छान तळलेला पापड तिखट मीठ घालूनही मस्त लागतो.
बटाट्याचा किस आजकाल कमी खाल्ला जातो. मात्र काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात दारोदारी बटाट्याचा किस वाळत घातला जायचा. पुढे वर्षभर हा किस साठवून ठेवला जायचा. चवीला एकदम मस्त असतो. त्याला मीठ, तिखट, चाट मसाला लावायचा म्हणजे चव आणखी भारी लागते.