उन्हाळा सुरू झाला की भूक कमी लागणे, अशक्तपणा येणे, पचन बिघडणे अशा तक्रारी वाढतात. अशा वेळी पोटाला हलकी, पचायला सोपी आणि शरीराला ऊर्जा देणारी मऊ खिचडी हा उत्तम पर्याय ठरतो. साधी डाळ-भाताची खिचडी उन्हाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. मऊ खिचडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती पचायला अत्यंत सोपी असते. (Healthy summer meal, light food for digestion must have Khichdi recipe )ज्यांना अॅसिडिटी, अपचन किंवा पोटफुगीचा त्रास होतो, त्यांच्यासाठी खिचडी आरामदायी अन्न आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. मऊ खिचडी पातळ असल्याने शरीराला आवश्यक द्रव आणि ऊर्जा दोन्ही मिळतात. विशेषतः आजारी व्यक्ती, लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी ती उत्तम आहे.
उन्हाळ्यात तेलकट, तिखट आणि जड पदार्थ टाळणे गरजेचे असते. अशा वेळी मऊ खिचडी हा हलका, पौष्टिक आणि समाधान देणारा पर्याय आहे. दुपारच्या जेवणात किंवा रात्री हलक्या आहारासाठी खिचडीचा समावेश केल्यास पोट शांत राहते आणि झोपही चांगली लागते. एकूणच, उन्हाळ्यात शरीराला विश्रांती देणारा, पोटासाठी सौम्य आणि आरोग्याला पूरक असा आहार म्हणजे मऊ खिचडी. अगदी सोपी रेसिपी आहे.
साहित्य
तांदूळ, मूगडाळ, तूप, मोहरी, जिरे, हिरवी मिरची, हळद, मीठ, पाणी, मेथीचे दाणे
कृती
१. तांदूळ मूगडाळ एकत्र करुन धुवायची. थोडावेळ भिजवायची. जेवढे तांदूळ तेवढीच डाळ असे प्रमाण ठेवा म्हणजे खिचडी मऊ होते. कुकरमध्ये चमचाभर तूप घ्यायचे. तुपावर मोहरी घालायची आणि तडतडू द्यायची. मोहरी मस्त तडतडली की त्यात जिरे घालायचे. जिरेही मस्त फुलू द्यायचे.
२. नंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. मिरची जास्त नको अगदीच चवीला घ्या. मेथीचे चार दाणे घाला आणि परतून घ्या. तांदूळ आणि मूगडाळीचे मिश्रण घालायचे. परतून घ्यायचे. त्यात पाणी ओतायचे. थोडी हळद घालायची. चवीनुसार मीठ घालायचे. जरा ढवळायचे आणि कुकर लावायचा. नेहमीपेक्षा जरा जास्त पाणी ठेवायचे.
३. शिटीही एखादी जास्तच काढायची. म्हणजे मिश्रण मऊ होते. गरमागरम खिचडी घ्यायची. त्यावर तूप घ्यायचे. गरमागरम खायची. सोबत भाजलेला पापड घेतला तर आणखी मज्जा येते.
