फळांच्या फोडी केल्यावर त्या प्रत्येकवेळी संपतातच असे नाही. किंवा मुलांना डब्यात फळांच्या फोडी आपण देतो. मात्र त्या जरा काळ्या पडतात त्यामुळे खराब झाल्या असाव्यात असे समजून कोणी खात नाही. (Follow these 3 steps fruit slices won't look dirty, fruits will remain fresh )फळे कापून ठेवल्यावर ती काळसर होतात किंवा मऊ पडतात म्हणजे खराब होतात असे नाही. सफरचंद, केळी यांसारखी फळांचा तर काही मिनिटांतच रंग बदलतो. यामागचं मुख्य कारण म्हणजे ऑक्सिडेशन. Oxidation एक रासायनिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एखादा पदार्थ इलेक्ट्रॉन गमावतो, ऑक्सिजन स्वीकारतो किंवा हायड्रोजनही गमावतो. त्यामुळे फळांच्या फोडी हवेशी संपर्कात आल्या की त्यातले एन्झाइम्स ऑक्सिजनला प्रतिक्रिया देतात आणि त्यामुळे फळांचा नैसर्गिक रंग गडद होत जातो. त्यामुळे फळे खराब झाली नसली तरी खावीशी वाटत नाहीत. असे होऊ नये यासाठी काही साधे उपाय आहेत.
१. फळे कापल्यावर त्यांच्यावर लिंबू पिळायचा. लिंबाच्या रसामुळे फळांचा रंग बदलत नाही. तसेच संत्र्याचा रस हलक्या हाताने लावला तरी फायदा होतो. कारण या रसांतील सिट्रिक अॅसिड ऑक्सिडेशन थांबवण्याचे काम करते.
२. कापलेली फळे थंड पाण्यात ठेवली तरी ती काळी पडत नाहीत. विशेषतः जर त्या पाण्यात चिमूटभर मीठ टाकले असेल तर नक्कीच रंग बदलत नाहीत.
३. कापलेली फळे जर लगेच खायची नसतील तर ती हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावीत. थंड वातावरणात फळांवर फार प्रक्रिया होत नाहीत. त्यामुळे फळांचा रंग बदलत नाही.
खरं तर सर्वात सोपा आणि उत्तम उपाय म्हणजे फळे खाण्याच्या आधीच कापणे. कापून तासंतास ठेवण्याची गरज पडणार नाही इतकीच फळे घ्यावीत. फळे जास्त वेळासाठी तशीच राहिली तर ती खराब होतात. त्यावर जंतू तयार होतात. पण जर प्रसंग असाच आला की आधीच फळे कापून ठेवावी लागली, तर हे घरगुती उपाय नक्कीच करून बघा. त्यामुळे फळांचा रंग, चव आणि ताजेपणा बराच वेळ टिकतो डब्यासाठी फळे देताना या टिप्स नक्कीच फायद्याच्या ठरतील.