उन्हाळ्यात किंवा थकवा जाणवत असताना अनेक जण लिंबू सरबत पिणे पसंत करतात. पण बाजारात किंवा घरी बनवलेले लिंबू सरबत बहुतेक वेळा जास्त साखरेचे असते. त्यामुळे लगेच ऊर्जा मिळाल्यासारखी वाटली तरी नंतर थकवा वाढतो. याच्या तुलनेत लिंबाचा रस, सैंधव मीठ आणि पाणी यांचे साधे मिश्रण शरीरासाठी अधिक नैसर्गिक आणि आरोग्यदायी ठरते. (Don't drink lemonade, drink lemon water - ..from cleansing the stomach to increasing energy, many benefits, one solution)सरबतात साखर न घालता असे लिंबू पाणी प्या. चव गोड नसली तरी आरोग्यासाठी टॉनिक असते.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे जीवनसत्त्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करते आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. लिंबाचा रस पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. सकाळी उपाशीपोटी हे मिश्रण घेतल्यास पोट साफ होण्यास हातभार लागतो आणि अॅसिडिटी, जडपणा कमी होतो. पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी हे मिश्रण फार फायद्याचे असते. लिंबू पाणी पित्त लगेच आटोक्यात आणते.
सैंधव मीठ हे साध्या पांढर्या मिठापेक्षा वेगळे असते. त्यात सोडियमबरोबरच पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखी खनिजे थोड्या प्रमाणात आढळतात. घामातून शरीरातील क्षार बाहेर पडतात, ते भरून काढण्याचे काम सैंधव मीठ करते. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल राखला जातो आणि अशक्तपणा, चक्कर येणे यासारखे त्रास होत नाहीत. शरीराला पुरेसे पाणी मिळाले की रक्ताभिसरण चांगले होते, विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते आणि शरीर थंड राहते. लिंबाचा रस आणि सैंधव मीठ पाण्यासोबत घेतल्यामुळे पाणी शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाते.
लिंबू सरबतात वापरली जाणारी साखर रक्तातील साखर वाढवते. त्यामुळे हे मिश्रण आरोग्यासाठी चांगले राहत नाही. त्यामुळे साखर न घालता, या पेयातून व्हिटॅमिन सी, थोड्या प्रमाणात बी-कॉम्प्लेक्स, तसेच सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे मिळतात. त्यामुळे हे पेय पचन सुधारण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी आणि शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.
थोडक्यात सांगायचे तर, गोड लिंबू सरबताच्या तात्पुरत्या चवीपेक्षा लिंबाचा रस, सैंधव मीठ आणि पाणी यांचे साधे मिश्रण आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. रोजच्या सवयीत योग्य प्रमाणात घेतल्यास हे पेय शरीराला नैसर्गिकरित्या ऊर्जा देणारे आणि आरोग्य जपणारे ठरते.
