उन्हाळा सुरू झाला की शरीरात उष्णता वाढते आणि पित्ताचा त्रास पटकन जाणवू लागतो. पोटात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, तोंड कडू होणे किंवा जास्त गरम होणे अशा तक्रारी अनेकांच्या असतात. त्यामुळे या दिवसांत आहार थोडा हलका ठेवणं आणि काही उष्ण स्वभावाचे पदार्थ कमी खाणं फायदेशीर ठरतं. ()अनेक पदार्थ आपण रोजच्या आहारात घेत असतो, पण उन्हाळ्यात त्यांचं प्रमाण कमी ठेवणं चांगलं मानलं जातं.
उन्हाळ्यात मेथीचे दाणे जास्त प्रमाणात खाणं टाळावं. मेथी आरोग्यासाठी उपयुक्त असली तरी तिचा स्वभाव उष्ण मानला जातो. त्यामुळे रोज मेथीचे दाणे भिजवून खाणं किंवा मेथीचं पाणी पिणं काहींना पित्त वाढवू शकतं. उन्हाळ्यात हे पदार्थ कमी प्रमाणात घेतले तर पोटावर ताण येत नाही.
तीळ हा देखील उष्ण स्वभावाचा पदार्थ मानला जातो. तिळाची चटणी, तिळाचे लाडू किंवा तिळाचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरात उष्णता वाढू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात तिळाचं सेवन मर्यादित ठेवणं योग्य ठरतं.
अनेकांच्या आहारात आले नियमित वापरलं जातं. आले पचनासाठी चांगलं असलं तरी त्याचा स्वभावही उष्ण असतो. त्यामुळे उन्हाळ्यात आले जास्त प्रमाणात वापरलं तर काहींना अॅसिडिटी किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते कमी प्रमाणात वापरणं चांगलं.
लसूण हा पदार्थही उष्ण मानला जातो. लसूण घातलेले पदार्थ चविष्ट लागतात, पण उन्हाळ्यात लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्यास काहींना पोटात जळजळ होऊ शकते. त्यामुळे या दिवसांत त्याचं प्रमाण थोडं कमी ठेवणं फायदेशीर ठरतं.
तसेच गूळ जास्त प्रमाणात खाणंही उन्हाळ्यात टाळावं. गूळ आरोग्यासाठी चांगला असला तरी शरीरातील उष्ण वाढण्यास तो मदत करतो. बंद करायला नको फक्त जरा कमी वापरावा कारण जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढू शकते.
उन्हाळ्यात आहार शक्यतो हलका आणि शरीराला थंडावा देणारा ठेवणं अधिक चांगलं ठरतं. त्यामुळे दही, ताक, काकडी, फळं, भाजीपाला आणि भरपूर पाणी यांचा आहारात समावेश केला तर शरीराला थंडावा मिळतो आणि पित्ताचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. योग्य आहारामुळे उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रासही कमी जाणवतो.
