Comedian Zakir Khan Health: सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याने प्लेपॅक सिंगिंगमधून घेतलेल्या निवृत्तीची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याची वेगवेगळी कारणंही समोर येत आहेत. त्याआधी आपल्या सर्वांना खळखळून हसायला लावणारा प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन झाकीर खान यानेही आपल्या कामातून काही वर्षांचा ब्रेक घेण्याची घोषणा केली. पण या दोन मोठ्या स्टारनी अशाप्रकारे कामातून निवृत्ती किंवा ब्रेक घेण्याचा निर्णय का घेतला असावा? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडणं साहजिक आहे. झाकीरने कामातून ब्रेक का घेतला, हे आज आपण जाणून घेणार आहोत. सोबतच यातून हेही कळेल की, ही स्थिती कशामुळे आली आहे.
जेनेटिक आजार...
झाकीर खानच्या मते, त्यांच्या कुटुंबात एक विशिष्ट वयानंतर ही समस्या दिसून येते. ही आजारपणाची स्थिती जीवघेणी नसली तरी त्यातून तीव्र शारीरिक त्रास, थकवा आणि बर्नआउट होतो. सतत काम, अपुरी झोप आणि मानसिक दबाव यामुळे शरीर पूर्णपणे थकून गेल्याचं त्याने मान्य केलं आहे. याच कारणामुळे ‘पापा यार’ या आगामी प्रोजेक्टनंतर त्याने दीर्घ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बर्नआउट म्हणजे काय?
सतत काम, ताणतणाव, अपुरी झोप आणि विश्रांतीचा अभाव यामुळे शरीर आणि मेंदू पूर्णपणे थकून जातो, त्या अवस्थेला बर्नआउट असं म्हणतात. या स्थितीत काम करण्याची क्षमता खूप जास्त घटते. वैद्यकीय भाषेत याला क्रॉनिक स्ट्रेस सिंड्रोम असेंही म्हटलं जातं.
झाकीर खानने सांगितलं की, हा बर्नआउट त्यांच्या शरीरातील जेनेटिक घटकांमुळे अधिक तीव्र झाला आहे. डॉक्टरांनी त्याला सुरुवातीच्या टप्प्यातच जीवनशैली बदलण्याचा सल्ला दिला असून, तसं न केल्यास पुढे गंभीर अडचणी येऊ शकतात.
नेमकी काय आहे समस्या?
‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना झाकीर म्हणाला की, “मी तीन, चार किंवा पाच वर्षांचा ब्रेक घेऊ शकतो. या काळात मी माझ्या आरोग्यावर आणि आयुष्याच्या इतर पैलूंवर लक्ष केंद्रित करू इच्छितो.”
‘गल्फ न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत तो सांगतो की, त्याच्या कुटुंबात काही जेनेटिक आजार आहेत जे एका विशिष्ट वयानंतर समोर येतात. त्यातच त्यांनी स्वतःही शरीराकडे दुर्लक्ष केले. केवळ दोन तास झोप घेऊन सतत प्रवास, शो आणि चाहत्यांशी भेटी सुरू ठेवण्यामुळे शरीराला मोठा फटका बसला. तो पुढे म्हणाले की, कुटुंबात मोठं यश मिळवणारा तो पहिला व्यक्ती असल्याने त्याच्यावर सातत्याने दबाव होता. जवळपास दहा वर्षे त्याने आरोग्यापेक्षा कामालाच प्राधान्य दिलं.
दीर्घकाळ दुर्लक्ष करणं ठरू शकतं धोकादायक
एलीट केअर क्लिनिकचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. पल्लिटी शिवा कार्तिक रेड्डी यांनी एका वेबसाईटला सांगितलं की, तरुण वयात शरीर काही काळ स्वतःला सावरतं, त्यामुळे कमी झोपेचा फारसा परिणाम होत नाही असा भ्रम निर्माण होतो. मात्र दीर्घकाळ झोपेचा अभाव आणि सततचा ताण हार्मोनल संतुलन, रोगप्रतिकारक शक्ती, मेटाबॉलिझम आणि हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतो. यामुळे सतत थकवा, शरीरात सूज, इन्सुलिन रेजिस्टन्स, पचनाच्या तक्रारी, चिंता, नैराश्य आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
लाइफस्टाईल बदलणं का आवश्यक?
ज्या लोकांच्या कुटुंबात अशा समस्या दिसून येतात, त्यांच्यासाठी योग्य जीवनशैली अत्यंत महत्त्वाची असल्याचं डॉ. रेड्डी सांगतात. लाइफस्टाईलवरूनच जेनेटिक आजार लवकर सक्रिय होतील की उशिरा, हे ठरतं. त्यांच्या मते नियमित आणि पुरेशी झोप, ताणतणाव नियंत्रण, संतुलित आहार, वेळोवेळी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ तपासण्या यामुळे आजारांचे परिणाम कमी करता येतात किंवा त्यांना लांबणीवर टाकता येते. मात्र, सतत थकवा, कारण नसताना वेदना, पचनाचे त्रास, मूडमध्ये बदल किंवा साध्या आजारातूनही उशिरा बरे होणे ही लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
