वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना?; आदित्यवर मात करण्यासाठी शिंदे गटाची नवी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 03:52 PM2023-02-07T15:52:32+5:302023-02-07T15:55:51+5:30

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर आक्रमक टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यासोबतच आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याची भाषा केली आहे.

वरळीतून मी राजीनामा देतो, मुख्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी, कितीही ताकद लावा, यंत्रणा वापरा, तुम्ही कसे निवडून येता ते मी बघतोच अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिले होते.

मात्र त्याच वरळी विधानसभा निवडणुकीत आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळू शकतो. आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना मात करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही नवी खेळी खेळू शकतात असं राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

वरळी विधानसभेसाठी निहार ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे. शिंदे गटाकडून निहार ठाकरे यांच्या नावाचा या मतदारसंघासाठी विचार सुरू आहे. याबाबत शिंदे गटातील नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे अशी बातमी समोर येत आहे.

वरळी मतदारसंघातून निहार ठाकरेंना मैदानात उतरवलं जाऊ शकते. त्याबाबत पार्टीत चर्चा सुरू आहे. निहार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. ते व्यवसायाने वकील आहे.

निहार ठाकरे हे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावईदेखील आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत २ गट पडले त्यात ठाकरे कुटुंबातील निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला होता. इतकेच नाही तर निहार ठाकरे शिंदे गटाची बाजू कोर्टात मांडतात.

एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात व्यासपीठावर उपस्थित असलेले बाळासाहेब ठाकरेंचे नातू निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांना पुढे आणत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची मक्तेदारी मोडायची रणनीती शिंदे गटानं अवलंबली होती.

आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून त्यांच्याविरोधात लढण्याचं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. त्याचसोबत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटात गेलेल्या आमदार, खासदारांना राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जा असं सातत्याने चॅलेंज देत आहेत.

तर एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वरळीत येणार आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानानुसार त्यांनी राजीनामा देऊनच वरळीत येऊन दाखवावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

आदित्य ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा द्या. जनतेत उतरून निवडणूक लढवून दाखवा. तुम्ही ठाण्यात लढणार असाल मी ठाण्यात येतो अन्यथा माझ्या वरळी मतदार संघात माझ्याविरुद्ध लढवून दाखवा असंही म्हटलं आहे.