'नाना पटोले रांगडा गडी, तर चंद्रकांत पाटील निरागसतेचं लेणं'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 01:08 PM2021-07-14T13:08:31+5:302021-07-14T13:16:11+5:30

राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. नानांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडत आहे. शिवसेनेनं नानांना वक्तव्यावरुन हो द्या खळबळ, असे म्हणत नानांचं कौतुक करताना अप्रत्यक्ष टीकाही केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गेल्या काही दिवसांतील वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ आणि त्यातून महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

त्यामुळे, राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. नानांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडत आहे. शिवसेनेनं नानांना वक्तव्यावरुन हो द्या खळबळ, असे म्हणत नानांचं कौतुक करताना अप्रत्यक्ष टीकाही केली आहे.

शरद पवारांसारखे मोठे नेते नानांना छोटा माणूस मानतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असा टोमणा मारतात. हीच नानांच्या कार्यकुशलतेची पोचपावती आहे.

नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात.

नानांनी तेच केले. नानांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केले, पण नानांच्या भाषणाचा खरा रोख भाजपवरच होता.

भाजपशी आमचे जमणार नाही. भाजपला मदत होईल असे काही करणार नाही, असे नाना सांगत आहेत. त्यावर कोणी लक्ष देत नाही.

नानांनी त्यांची मन की बात सांगितली. त्या मन की बातने थोडी खळबळ माजली. ठीक आहे, होऊ द्या खळबळ! असे शिवसेनेनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे नानांना लहान माणसे संबोधत शरद पवारांची री... ओढण्याचं काम शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आलंय.

नानांवर खळबळजनक भाष्य करताना शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांनाही सामनातून चिमटा काढला आहे. नाना हा विदर्भाच्या मातीतला रांगडा गडी आहे. मनास येईल ते दाणकन बोलतो. भाजपचे चंद्रकांत पाटील वगैरे पुढारीही मनास येईल ते बोलत असतात.

पण पाटील हे निरागसतेचे लेणे आहे. ते एक निष्पाप बालक आहेत. त्यांच्या हसण्या-बागडण्याचे महाराष्ट्राला जितके कौतुक तितकेच कौतुक नानांच्या रांगडय़ा बोलीचे आहे, असा खोचक टोमणा संजय राऊत यांनी लगावला आहे.

अर्थात महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार या असल्या हसण्या, बोलण्याने, बागडण्याने ढिले पडणार नाही. ते काल मजबूत होते, आजही आहे आणि उद्यादेखील मजबूत राहील, असेही राऊत यांनी म्हटले.

मात्र, नाना पटोलेंवर भाष्य करताना संजय राऊत यांनी एकप्रकारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्लीच उडवली आहे.