'शेतकऱ्यांच्या ह्रदयापर्यंत जाणारा रस्ता बांधा, भिंत बांधून काय साध्य करता'

By महेश गलांडे | Published: February 3, 2021 10:32 AM2021-02-03T10:32:30+5:302021-02-03T11:31:45+5:30

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्यी सिंघू सीमेवर (Singhu Border) आंदोलन करत असणाऱ्या शेतकरी आंदोलकांची नाचक्की करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आता नवे हातखंडे आजमवण्यास सुरुवात केली आहे. याचं एक भयाण वास्तव समोर आलं आहे.

सिंघू सीमेवर दिल्ली पोलिसांनी चार ते पाच फुटांची भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीच्या पलिकडे पाच पदरी बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. हे बॅकिरेट्स जवळपास १.५ किमी इतके दूरवर पसरले आहेत.

या बॅरिकेट्समुळे शेतकरी आंदोलकांना दिल्ली जल बोर्डाच्या पाण्याच्या टँकर्सपर्यंत पोहोचता येत नाहीय. इतकंच नव्हे, तर शेतकरी आंदोलकांसाठी ठेवण्यात आलेल्या मोबाइल टॉयलेट्सपर्यंतही पोहोचणं आता कठीण झालं आहे.

दिल्ली पोलिसांकडून शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी फक्त बॅरिकेट्स उभारण्यात आलेले नाहीत. तर बॅरिकेट्ससोबतच मोठे कंटेनर्स ठेवून रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत. या कंटेनर्समध्ये सिमेंटच्या गोण्या भरण्यात आल्यात.

दिल्लीच्या दिशेनं एक पाच फुटांची सिमेंटची भिंत उभारण्यात आलीय तर बॅरिकेट्सची भलीमोठी रांगच या भिंती पलिकडे उभारण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या या वागणुकीमुळे शेतकरी आंदोलकांमध्ये कमालीचा रोष आहे. तरीही आंदोलन थांबणार या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. "आम्ही शेतकरी आहोत. गरज पडली तर बोअरवेल खणून पाणी मिळवू पण आम्ही घाबरुन जाऊ असा सरकारने अजिबात विचार करू नये. जोवर आमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होत नाही तोवर आम्ही इथून माघारी जाणार नाही", असं शेतकरी आंदोलक कुलजित सिंग म्हणाले.

कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली सीमारेषेवरील काही फोटो शेअर करुन, भिंती काय बांधता ? असा प्रश्न विचारला आहे.

सरकारने शेतकऱ्यांच्या ह्रदयापर्यंत जाणारा रस्ता बांधायला हवा, त्याऐवजी अडवणूक करणाऱ्या भिंती काय बांधता, असे रोहित यांनी आपल्या ट्विटर अकांटवरुन म्हटलंय.

दिल्ली पोलिसांकडून सिंधु बॉर्डरसह इतरही सीमारेषांवर बॅरिकेट्स आणि भिंती उभ्या करण्यात आल्या आहेत. आंदोलकांचे ट्रॅक्टर पुढे येऊच नयेत, यासाठी मोठ्या सळया ठोकण्यात आल्या आहेत.

26 जानेवार प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनास हिंसक वळण लागले होते. त्यानंतर, पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यास मज्जाव केला आहे

शेतकऱ्यांना सीमारेषेवरच अडविण्यात येत असून बॅरिकेट्स आणि भिंती बांधून रस्ते अडविण्यात आले आहेत.

मोठमोठ्या सळयाही रस्त्यातच सिमेंटच्या सहाय्याने उभारण्यात आल्या आहेत, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पुढे येऊच नयेत, यासाठी असं करण्यात आलंय.

सिमेंटच्या सळया ठोकताना मजूर कारागिर या फोटोत दिसत आहे, आंदोलक शेतकऱ्यांना जागीच थाबविण्याचा हा प्रयत्न आहे.

शेतकरी आंदोलनाचा आज 68 वा दिवस असून शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.