India vs Australia, 4th Test : ७२ वर्षांनी घडला विक्रम; टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर यांचा पदार्पणातच भारी पराक्रम

India vs Australia, 4th Test : फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर भारताच्या अनुनभवी गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. एकूण ३-४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या भारतीय गोलंदाजांनी चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीचे सकाळचे सत्र नावावर केले.

शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) व वॉशिंग्टन सूंदर ( Washington Sunder) यांनी कांगारूंना धक्के देताना त्यांचा डाव गुंडाळला. शार्दूलच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये रोहित शर्मानं ( Rohit Sharma) टिपलेला सुरेख झेल आणि सुंदरच्या फिरकीनं ऑसींच्या यष्टिंचा घेतलेला वेध, हे पहिल्या सत्राचे हायलाईट्स ठरले.

५ बाद २७४ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी टीम पेन व कॅमेरून ग्रीन ही सेट जोडी मैदानावर उतरली. भारतीय गोलंदाजांचा ते चांगलाच समाचार घेतील असेच चित्र सुरुवातीला दिसत होते.

टीम पेननं अर्धशतक पूर्ण करून त्याचे मनसुबे स्पष्ट केले. पण, शार्दूल ठाकूरनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. अप्रतिम आऊटसिंग चेंडूवर पेनला खेळण्यास भाग पाडले आणि दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहितनं शार्प कॅच घेतला. पेन १०४ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५० धावांवर माघारी परतला. २०१०-११नंतर पेननं एकाच कसोटी मालिकेत प्रथमच दोन अर्धशतकी खेळी केल्या.

शार्दूलच्या धक्क्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं दुसरा सेट फलंदाज कॅमेरून ग्रीनचा त्रिफळा उडवला. ग्रीन ४७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर शार्दूलनं पॅट कमिन्स ( पायचीत) व सुंदरनं नॅथन लियॉन ( त्रिफळा) यांना बाद केले. टी नटराजननं अखेरची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव ३६९ धावांवर गुंडाळला.

ऑस्ट्रेलियासाठी मार्नस लाबुशेननं ( १०८ धावा) शतकी खेळी केली, तर टीम पेन (५०), कॅमेरून ग्रीन (४८) आणि मॅथ्यू वेड (४५ ) यांनी योगदान दिले.

ऑस्ट्रेलियाचा संघ एकावेळी ३ बाद २०० धावा अशा मजबूत स्थितीत होता, परंतु टीम इंडियाच्या अनुनभवी गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले आणि त्यांचा संपूर्ण डाव ३६९ धावांत गुंडाळला.

शार्दूल ठाकूर, टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजला एका विकेटवर समाधान मानावे लागले.

१९४८-४९च्या कोलकाता कसोटीनंतर प्रथमच दोन पदार्पणवीरांनी एकाच डावात प्रत्येकी तीन विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. १९४९च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत मंतू बॅनर्जी व गुलाम अहमद यांनी हा पराक्रम केला होता आणि त्यांच्यानंतर आज टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांनी ही कामगिरी केली.