IPL 2020 मध्यंतरानंतर अजिंक्य रहाणे दुसऱ्या संघात जाणार? दिल्ली कॅपिटल्सनं दिले मोठे अपडेट्स

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग ( Ricky Ponting) याच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाची Indian Premier League ( IPL 2020) मधील कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे.

स्पर्धेला सुरुवात होण्याआधापासून DC हा जेतेपदाच्या शर्यतीत होता. त्यांच्याकडे भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंची तगडी फौज आहे. त्यात त्यांनी अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane) आपल्या ताफ्यात घेत, फलंदाजांची आणखी तगडी फौज तयार केली.

दिल्ली कॅपिटल्सने ( DC) पाच सामन्यांत चार विजय मिळवून 8 गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान पटकावले आहे. पण, DC या पाचही सामन्यात पृथ्वी शॉ व शिखर धवन या सलामीच्या जोडीनेच मैदानावर उतरला.

अजिंक्य रहाणेला एकही सामना खेळण्याची संधी दिली गेली नाही. त्यामुळे IPL Mid Season Transfer मध्ये अजिंक्य दुसऱ्या संघात जाईल अशी चर्चा सुरू झाली.

IPL 2020 मध्यंतरानंतर Mid Season Transferला सुरुवात होईल आणि त्यानुसार संघ त्यांना हवा त्या खेळाडूंची देवाण-घेवाण करू शकतील. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स सलामीसाठी पर्याय म्हणून अजिंक्यचा विचार करू शकतील, अशी चर्चा आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्यांना या बाबत विचारले असता त्यांनी पृथ्वी शॉ व शिखर धवन हेच सलामीचे पर्याय आहेत आणि त्यांनाच कायम राखले जाईल, असे स्पष्ट केले.

''सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेवर संघ निवडला जात नाही. अजिंक्य रहाणे हा अविश्वसनीय खेळाडू आहे आणि त्याच्यासोबत मोठा अनुभव आमच्या संघात आला आहे. पण, धवन आणि शॉ यांची कामगिरी उल्लेखनीय होत आहे. त्यामुळे जे तुटलेच नाही, त्याला जोडता कसं येईल. मागील दोन मोसमात आम्ही ज्या खेळाडूंवर विश्वास ठेवला आताही त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. धवन आणि शॉ यांनी त्यांच्या कामगिरीतून सिद्ध केलं आहे. रहाणेला त्याची संधी येईपर्यंत वाट पाहावी लागले,''असेही दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पृथ्वी शॉनं पाच सामन्यांत दोन अर्धशतकांसह १७९ धावा केल्या आहेत, तर शिखर धवनने १२७ धावा केल्या आहेत. पण, IPLच्या मध्यंतरानंतर ट्रेड करण्यासाठी अजिंक्यला आम्ही राजस्थान रॉयल्सकडून घेतलेले नाही, हेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

''तो संघाचा सदस्य आहे आणि Mid Seadon Transferसाठी त्याला आम्ही संघात घेतलेले नाही. तो संघासाठी जे शक्य आहे ते योगदान देण्यासाठी तयार आहे,'' असेही त्यांनी सांगितले.

अजिंक्य रहाणेची IPL मधील कामगिरी - 140 सामने, 3820 धावा, 105* सर्वोत्तम, 2 शतकं व 27 अर्धशतकं, 404 चौकार , 74 षटकार, 55 झेल, 1 विकेट