IPL 2020 :...म्हणून दिल्ली कॅपिटल्सला यंदाच्या हंगामात नमवणे कठीण, विराटने सांगितलं नेमकं कारण

Virat Kohli News : दिल्लीविरुद्ध झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

आयपीएलमध्ये सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या लढतीत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले की, आरसीबीची कामगिरी चांगली होत आहे. मात्र काही महत्त्वाच्या क्षणी संघाने अधिक व्यावसायिक दृष्टीकोन अवलंबण्याची गरज आहे.

दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी झालेल्या लढतीत आरसीबीला ५९ धावांनी नमवले होते. दिल्लीने दिलेल्या १९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची फलंदाजी गडगडली होती.

विराट म्हणाला की, हा सामना आमच्या बाजूने गेला नाही. निर्णायक क्षणी आम्हाला चांगला खेळ करावा लागेल. आम्ही रणनीत मैदानात प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये यशस्वी ठरलेलो नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आम्ही पाच वर्षांत तीन सामने जिंकले आहेत. आम्ही चांगलं क्रिकेट खेळत आहोत हे आता केवळ महत्त्वाच्या क्षणी आम्हाला अधिक व्यावसायिक व्हावं लागेल.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी एक मोठी भागीदारी करावी लागेल, अशी चर्चा झाली होती. मैदानावर दव होता. अशा परिस्थितीत तुमच्याकडे अखेरच्या दहा षटकांत आठ विकेट्स असल्यास १०० धावांची गरज असली तरी सामना तुमच्या बाजूने असतो.

यावेळी विराटने दिल्लीच्या संघाचे कौतुक केले. तो म्हणाला दिल्ली कॅपिटल्सचा संघ चांगला क्रिकेट खेळत आहे. त्यांची फलंदाजी चांगली आहे. त्यांच्याकडे चांगले गोलंदाजी आक्रमण आहे. त्यांच्याकडील फिरकी गोलंदाजीसुद्धा जबरदस्त आहे. मी असं म्हणणार नाही की त्यांना हरवता येणार नाही. पण त्यांना नमवणे कठीण आहे, हे नक्की सांगेन.