India vs Australia, 4th Test : वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरनं मोडले अनेक विक्रम; ७४ वर्षांनंतर प्रथमच घडला पराक्रम

India vs Australia, 4th Test Day 3 : आघाडीचे सहा फलंदाज माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचे शेपूट झटपट गुंडाळून मोठी आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऑस्ट्रेलियाला चांगली चपराक बसली. पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांनी ऑसी गोलंदाजांना धु धु धुतले.

भारताकडून पहिल्या डावात सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रमाही दोघांनी नावावर केला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला आणि कपिल देव व मनोज प्रभाकर यांचा २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. तसेच सुंदरनं ११० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पराक्रमी कामगिरी करणाऱ्या फलंदाजाचा मान पटकावला.

ऑस्ट्रेलियानं पहिल्या सत्रात अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजाराला माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. मयांक अग्रवाल ( Mayank Agarawal) पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरला. त्यात रिषभ पंतही ( Rishabh Pant) विचित्र फटका मारून माघारी परतल्यानं टीम इंडिया संकटात सापडली.

सुंदर आणि ठाकूर यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. फलकावर १८६ धावा असताना रिषभ माघारी परतला. भारत १८३ धावांनी पिछाडीवर होता आणि ऑस्ट्रेलिया शेपूट झटपट गुंडाळेल असेच वाटत होते.

सुंदर आणि ठाकूर यांनी ऑसींना धक्का दिला. दोघांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या डावातील ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली. या दोघांनी ब्रिस्बेनवर भारतासाठी सातव्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारीचा विक्रमही नावावर केला. या दोघांनी ५९ धावा करताच १९९१चा कपिल देव व मनोज प्रभाकर यांचा विक्रम मोडला. कपिल देव - मनोद प्रभाकर यांनी ५८ धावांची भागीदारी केली होती.

वॉशिंग्टन सुंदरनं पदार्पणात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४९* धावा करताना ऑस्ट्रेलियात पदार्पणात १९११नंतरची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली. ११० वर्षांपूर्वी इंग्लंडच्या फ्रँक फोस्टर यांनी ५६ धावा चोपल्या होत्या. गॅबा कसोटीत पदार्पणात १०० चेंडूंचा सामना करणारा सुंदर हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.

कसोटी पदार्पणात अर्धशतक व तीन विकेट्स घेणारा सुंदर हा दहावा खेळाडू ठरला, तर १९४७नंतर दत्तू फडकर ( वि. ऑस्ट्रेलिया) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.

आतापर्यंत तीन भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियात पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावता आलं. दत्तू फडकर ( १९४७), मयांक अग्रवाल ( २०१८) आणि वॉशिंग्टन सुंदर ( २०२१) यांनी हा पराक्रम केला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणात अर्धशतक झळकावणारा वॉशिंग्टन सुंदर हा सहावा भारतीय. यापूर्वी शिखर धवन, गुंडप्पा विश्वनाथ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, दत्तू फडकर यांनी हा कामगिरी केली आहे.

वॉशिंग्टन सुंदर यानं विजय मांजरेकर यांचा कसोटी पदार्पणातील ४८ धावांचा ( वि. इंग्लंड, कोलकाता १९५१) विक्रम मोडला.

कसोटी क्रिकेटमध्ये ७ व्या व ८व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करण्याची ही भारतासाठीची १२वी वेळ आहे आणि आशिया खंडाबाहेर तिसऱ्यांदा असा पराक्रम झाला आहे.

सूंदर व शार्दूल यांची भागादारी १२३ धावांवर संपुष्टात आली. शार्दूल ठाकूर ६७ धावांवर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला