India vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम

India vs Australia, 3rd ODI : टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना टीम इंडियाच्या धावगतीवर अंकुश ठेवला होता. पण, हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी सर्व चित्रच बदललं. विराट कोहली ( Virat Kohli), हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांची अर्धशतकी खेळी, ही टीम इंडियासाठी समाधानकारक बाब ठरली. हार्दिक-रवींद्रने विक्रमी कामगिरी केली.

मयांक अग्रवालला ( Mayank Agarawal) विश्रांती दिल्यानं शिखर धवनसह सलामीला शुबमन गिल आला. धवन व गिल जोडीला पहिल्या विकेटसाठी २६ धावाच करता आल्या. सीन अॅबोटनं सहाव्या षटकात धवनला ( १६) सहज बाद केले. कव्हरला उभ्या असलेल्या अॅश्टन अॅगरनं सोपा झेल टिपला.

विराट-शुबमन जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाला सावरलं. पण, अॅश्टन अॅगरनं शुबमनला ( ३३) पायचीत करून ही भागीदारी संपुष्टात आणली. श्रेयस अय्यर पुन्हा अपयशी ठरला. अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस ( १९) झेलबाद झाला.

लोकेश राहुलनेही निराश केलं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीच्चून मारा करताना भारताच्या धावगतीवर लगाम लावताना फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले. राहुल ५ धावांवर पायचीत झाला. विराट हा एकमेव आशास्थान टीम इंडियासाठी मैदानावर होता. पण, जोश हेझलवूडनं त्याची विकेट काढली. विराट ७८ चेंडूंत ५ चौकारासह ६३ धावांवर माघारी परतला.

हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिकनं मालिकेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील ६वे अर्धशतक पूर्ण केले. जडेजानेही १३वे अर्धशतक पूर्ण करून हार्दिकला तोडीसतोड साथ दिली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९९९ मध्ये सदगोपन रमेश आणि रॉबिन सिंग यांनी १२३ धावांची भागीदारी केली होती. तो विक्रम आज हार्दिक-रवींद्र जोडीनं तोडला. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३०२ धावा केल्या. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ९२ धावांवर, तर रवींद्र ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.

१९९१-९२नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रथमच भारतीय संघाकडून वन डे मालिकेत एकही वैयक्तित शतकी खेळी झाली नाही. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिकेत एकाही भारतीय फलंदाजांना शतकी खेळी करता न आल्याची ही पहिलीच वेळ आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर सहाव्या विकेटसाठी हार्दिक-रवींद्रने १५० धावांची भागीदारी केली. या जोडीनं श्रीलंकेच्या डी मेंडिस व अरविंद डी सिल्वा यांनी १९८५साली सहव्या विकेटसाठी नोंदवलेला १३९ धावांचा विक्रम मोडला.

भारतासाही सहाव्या विकेटसाठी ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. अंबाती रायुडू व स्टुअर्ट बिन्नी यांनी २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १६०, तर महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांनी २००५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १५८ धावांची भागीदारी केली होती.

एकाच वन डे मालिकेत दोनवेळा ९० धावांवर राहण्याची ही टीम इंडियाकडून दुसरी वेळ. यापूर्वी १९८२मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कृष्णमचारी श्रीकांत यांनी अशी कामगिरी केली होती.