महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 08:09 IST2026-04-27T08:09:18+5:302026-04-27T08:09:52+5:30

MMR मधील शहरांच्या कनेक्टिव्हिटीला मिळणार नवे पंख, ज्यामध्ये विद्यमान मार्गांवरील २० टर्मिनल्सचे आधुनिकीकरण आणि १२ नवीन मार्गांवर २४ नवीन टर्मिनल्स विकसित करण्याची शिफारस केली आहे

Water Metro in Mumbai to gain momentum! 26 terminals to be built; New connections to cities, what will change? | महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?

महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?

नारायण जाधव

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक समस्येवर प्रभावी उपाय ठरणाऱ्या ‘मुंबई वॉटर मेट्रो’ प्रकल्पाला आता वेग आला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी)ने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी प्रस्ताव विनंती (आरएफपी) जारी केली असून, पीपीपी मॉडेल अर्थात खासगी सहभागातून अत्याधुनिक टर्मिनल्स, नौकानयन आणि आपत्कालीन पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.

मुंबईत सध्या दरवर्षी सुमारे १.६ कोटी प्रवासी जलवाहतुकीचा वापर करतात. रस्ते व रेल्वेवरील वाढता ताण कमी करण्यासाठी आणि समुद्रकिनाऱ्याचा प्रभावी वापर करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. कोची वॉटर मेट्रो लिमिटेडने एक सर्वसमावेशक पूर्व-व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे, ज्यामध्ये विद्यमान मार्गांवरील २० टर्मिनल्सचे आधुनिकीकरण आणि १२ नवीन मार्गांवर २४ नवीन टर्मिनल्स विकसित करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार मेरिटाईम बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

सल्लागाराची भूमिका
निवडला जाणारा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार प्रकल्प व्यवस्थापन, आराखडा तयार करणे, खरेदी प्रक्रियेला साहाय्य, बांधकाम व विकासाचे पर्यवेक्षण तसेच टर्मिनल्स आणि आपत्कालीन सुविधांच्या उभारणीत समन्वय साधणार आहे.

पीपीपी मॉडेलवर भर
हा प्रकल्प पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर राबवला जाणार आहे.  यामध्ये एमएमबीकडून पायाभूत सुविधा उभारण्यात येणार असून खासगी कंपन्यांकडून बोटींची खरेदी, संचालन आणि देखभाल केलीजाणार आहे.

शहरांना नवे कनेक्शन
विद्यमान मार्ग (८) :  
वर्सोवा–मढ, बोरिवली/मार्वे–एस्सेलवर्ल्ड, मार्वे–मनोरी, गेटवे ऑफ इंडिया–एलिफंटा, गेटवे–मांडवा, बेलापूर–नेरूळ, बेलापूर-एलिफंटा आदी.
प्रस्तावित नवीन मार्ग (८) : वसई-मीरा-भाईंदर, वाशी-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गेटवे-वाशी, कल्याण-डोंबिवली- मुंब्रा-काल्हेर-कोलशेत, वांद्रे–वरळी-नरिमन पॉइंट यांसारखे महत्त्वाचे मार्ग.

काय बदलणार?
मुंबई वॉटर मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल, रस्ते व रेल्वेवरील ताण घटेल आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला मोठी चालना मिळेल. परिणामी एमएमआरमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. एकूणच, मुंबईच्या जलवाहतुकीच्या इतिहासात नवे पर्व सुरू करणारा हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक आधुनिक, सक्षम आणि शाश्वत बनविणारा ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात १६ मार्ग आणि २६ टर्मिनल्स विकसित करण्यात येतील. यात ८ विद्यमान मार्गांचे आधुनिकीकरण आणि ८ नवीन मार्गांची उभारणी केली जाणार आहे. हा प्रकल्प मुंबईला नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा-भाईंदरशी जलमार्गाने जोडले जातील.

Web Title : मुंबई वाटर मेट्रो की गति बढ़ी: 26 टर्मिनल, नए शहर कनेक्शन

Web Summary : मुंबई की वाटर मेट्रो परियोजना टर्मिनल निर्माण योजनाओं के साथ गति पकड़ रही है। इसका उद्देश्य जलमार्गों के माध्यम से मुंबई को आसपास के शहरों से जोड़कर यातायात की भीड़ को कम करना है।

Web Title : Mumbai Water Metro Speeds Up: 26 Terminals, New City Connections

Web Summary : Mumbai's Water Metro project accelerates with terminal construction plans. It aims to ease traffic congestion by connecting Mumbai with nearby cities via waterways, promoting eco-friendly transport.

टॅग्स :Metroमेट्रो