ऐनवेळी वाढला ‘ब्लॉक’काळ! भर उन्हात दीड किमी पायपीट; खासगी वाहनचालकांकडून लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 06:18 IST2026-04-27T06:18:01+5:302026-04-27T06:18:01+5:30
१५ तासांचा दीर्घ ब्लॉक पडला कमी, ब्लॉकचा कालावधी वाढल्यामुळे कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आसनगाव, टिटवाळा स्थानकांवरच थांबविण्यात आल्या होत्या

ऐनवेळी वाढला ‘ब्लॉक’काळ! भर उन्हात दीड किमी पायपीट; खासगी वाहनचालकांकडून लूट
कसारा - कल्याण ते कसारा स्थानकांदरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेच्या कामाचा भाग म्हणून खर्डी यार्डच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक असलेल्या ‘नॉन-इंटर लॉकिंग’ कामासाठी उंबरमाळी आणि आटगाव स्थानकांदरम्यान १५ तासांचा मेगाब्लॉक मध्य रेल्वेने घेतला होता. मात्र ब्लॉकचा कालावधी वाढल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. या ब्लॉक दरम्यान रेल्वे किंवा एसटी महामंडळाने कुठलीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली नव्हती. परिणामी खासगी वाहनचालकांनी सीटमागे २०० रुपये आकारून प्रवाशांची लूट केली.
शनिवार, २५ एप्रिल रोजी सकाळी ११ पासून रविवारी मध्यरात्री ३ पर्यंत उंबरमाळी ते आटगाव दरम्यान दोन्ही मार्गिकेवर ब्लॉक जाहीर करण्यात आला होता. मात्र, ब्लॉकचा कालावधी वाढल्यामुळे कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आसनगाव, टिटवाळा स्थानकांवरच थांबविण्यात आल्या होत्या.
पहाटे चारपर्यंतचा ब्लॉक रविवारी दुपारपर्यंत संपेना
शनिवारी सकाळी कसारा येथून १०:१८ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल शेवटची लोकल होती. पहाटे ४ पर्यंत जाहीर करण्यात आलेला मेगाब्लॉक रविवारी दुपारपर्यंत सुरू होता. परिणामी रविवारी देखील कल्याण- कसारा मार्गावरील वाहतूक अर्धा ते एक तास उशिराने सुरू होती. ब्लाॅकमुळे या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दोन दिवस मनस्ताप सहन करावा लागला.
कुणी निघाले पावले टाकत, कुणी बसले खासगी वाहनात
कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आसनगाव, टिटवाळा स्थानकावरच थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेकांना कुटुंबकबिल्यासह पुढील प्रवासासाठी उन्हातान्हातून दीड किलोमीटरची पायपीट करावी लागली. मुंबई-नाशिक महामार्गावरून खासगी वाहनाने इच्छित स्थळ गाठावे लागले.
३५ किलोमीटर अंतरासाठी मोजावे लागले २०० रुपये
मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे प्रशासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नसल्यामुळे तसेच ब्लॉक दरम्यान एसटी महामंडळाने देखील उदासीनता दाखवल्यामुळे प्रवाशांचे विशेषत: ज्येष्ठांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. या ब्लॉकचा फायदा घेण्यासाठी कसारा येथील खासगी वाहचालकांकडून कसाराहून आसनगाव रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी २०० रुपये आकारण्यात येत होते. वास्तविक हे अंतर ३५ किलोमीटर आहे.
मध्य रेल्वेकडून दुजाभाव
दरम्यान, खर्डी येथील यार्डच्या कामासाठी व उंबरमाळी ते आटगाव दरम्यानच्या कामासाठी हा ब्लॉक होता. त्यासाठी लोकल सेवा बंद होती. मात्र, लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू होत्या. जर रेल्वेने प्रवाशांना आसनगाव ते कसारा दरम्यान मेलने प्रवास करण्याची मुभा दिली असती तर काही प्रमाणात गैरसोय टळली असती.