उन्हाने फोडला चांगलाच घाम, मुंबईकरांची एसी लोकलकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 09:52 AM2024-04-03T09:52:46+5:302024-04-03T09:54:46+5:30
१ एप्रिलला पश्चिम रेल्वेवर ३,५६१ प्रवाशांनी काढला पास.
![summer heat pushes mumbaikars to take ac local passenger choosing to the ac local by regular one | उन्हाने फोडला चांगलाच घाम, मुंबईकरांची एसी लोकलकडे धाव summer heat pushes mumbaikars to take ac local passenger choosing to the ac local by regular one | उन्हाने फोडला चांगलाच घाम, मुंबईकरांची एसी लोकलकडे धाव](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/wr-1_2024041205160.jpg)
उन्हाने फोडला चांगलाच घाम, मुंबईकरांची एसी लोकलकडे धाव
मुंबई : वाढत्या उन्हामुळे एप्रिलच्या सुरुवातीलाच मुंबईकर हैराण झाले आहेत. उन्हाच्या झळांपासून बचाव व्हावा म्हणून, लोकल प्रवाशांची पावले एसी लोकलकडे वळू लागली आहेत. त्यामुळे एसी लोकलने प्रवास करणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. पश्चिम रेल्वेच्या तीन हजार ५६१ प्रवाशांनी सोमवारी, १ एप्रिल रोजी एसी लोकलचा पास काढला आहे.
राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा मार्चपासूनच वाढू लागला आहे. या महिन्यात मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. तर, एप्रिल आणि मे महिन्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. अशातच मुंबईकरांना उन्हाच्या झळा अधिक बसत असून, प्रवास गारेगार व्हावा, म्हणून ते एसी लोकलने प्रवास करण्यावर अधिक भर देत आहेत.
मध्य रेल्वे / एसी लोकल -
२०२३ तिकीट प्रवासी रक्कम
जानेवारी २,३८,८७३ १३,४९,४३० ५,८१,७६,८८०
फेब्रुवारी २,५३,९०१ १३,५०,२९९ ५,९४,९९,४००
मार्च २,८९,२४९ १५,१८,६६० ६,७३,०६,५३५
मध्य रेल्वे / एसी लोकल-
२०२४ तिकीट प्रवासी रक्कम
जानेवारी ३,५९,२८७ १९,५६,७८१ ८,३७,२४,८३५
फेब्रुवारी ३,६५,२६७ १८,८४,२७० ८,१७,९४,३२५
मार्च २,३५,३४६ १३,६६,४२५ ५,७७,८५,१६५
पश्चिम रेल्वेवर दररोज ९६ फेऱ्या -
पश्चिम रेल्वेवर सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन दिवसांत एसी लोकलच्या दररोज ९६ फेऱ्या होत आहेत. तर, शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी ५३ फेऱ्या होत आहेत.प.रे.वर १ एप्रिल रोजी २३ हजार ६२३ प्रवाशांनी एसी लोकलचे तिकीट काढले. तर, पास काढलेल्यांची संख्या तीन हजार ५६१ आहे.
वारे ‘ताप’ दायक -
१) अरबी समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे सकाळी स्थिर होतात. त्यामुळे तापमान स्थिर राहते.
२) मात्र, हे वारे स्थिर होण्यास दुपार झाल्यास वारे तापतात. परिणामी, मुंबईचे तापमान अधिक नोंदविले जाते.