शिवसेना UPAचा भाग नाही; त्यामुळे संजय राऊत यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही- काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:46 PM2021-03-25T15:46:30+5:302021-03-25T17:11:41+5:30
शिवसेनेने आधी यूपीएमध्ये सामील व्हावं, त्यानंतर अशी मागणी करावी, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
![Shiv Sena is not part of UPA; Therefore no right to speak about UPA; said Congress leader sachin sawant | शिवसेना UPAचा भाग नाही; त्यामुळे संजय राऊत यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही- काँग्रेस Shiv Sena is not part of UPA; Therefore no right to speak about UPA; said Congress leader sachin sawant | शिवसेना UPAचा भाग नाही; त्यामुळे संजय राऊत यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही- काँग्रेस](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/sahaha7_202103587102.jpg)
शिवसेना UPAचा भाग नाही; त्यामुळे संजय राऊत यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही- काँग्रेस
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी युपीएचे (UPA) नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसने नेतृत्व केलं. देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असे वाटत असेल तर यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं, अशी इच्छा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी पुन्हा व्यक्त केली आहे.
आतापर्यंत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यूपीएचं नेतृत्व चांगल्या प्रकारे केलं. मात्र, सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात नाही. आज अनेक प्रादेशिक पक्ष हे युपीएमध्ये नाही. पण त्यांना यूपीएमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यामुळे यासाठी शरद पवार योग्य असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मात्र संजय राऊत यांच्या या विधानावरुन काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, शिवसेना यूपीएचा भाग नाही. त्यामुळे यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत बोलण्याचा संजय राऊतांना अधिकार नाही. संजय राऊत यांना सातत्याने काहीतरी चांगलं लिहावं लागतं. म्हणून ते अशा मागण्या करत असतात. शिवसेनेने आधी यूपीएमध्ये सामील व्हावं, त्यानंतर अशी मागणी करावी, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी देखील संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना यूपीएबाबत बोलण्याचा कोणी अधिकार दिला, अशा शब्दात नवाब मलिक यांनी संजय राऊत यांनी सुनावले आहे.
तत्पूर्वी, सध्या देशात वेगळ्याप्रकारे सुरू आहेत. अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसच्या बाहेरील नेत्यानं करावं ही अनेक राज्यांतील प्रादेशिक पक्षांचीही मागणी आहे. आज युपीएही विकलांग अवस्थेत आहे, असंही रोखठोक मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. शरद पवार यांच्या मागे किती आमदार किंवा खासदार आहेत याचा हा प्रश्न नाही. संपूर्ण देशात जितके भाजप सोडून पक्ष आहेत जे आज युपीएमध्ये सामील नाहीत या सर्वांची ही एक मागणी आहे की युपीएचं पुनर्गठन झालं पाहिजे. युपीएच्या नेतृत्वात जर बदल झाले तर युपीए अधिक मजबूत होईल, असंही ते म्हणाले.
देशातील विरोधी पक्षांची आघाडी मजबूत करायची असेल आणि यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्षांचा सहभाग असावा असं वाटत असेल तर युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं. ही आमची वैयक्तिक मागणी नाही. शरद पवार हे युपीएचे प्रमुख बनतील का नाही हे मी सांगू शकत नाही. मी माझं मत लोकांचं मत सांगितलं. आम्ही दिल्लीत एकमेकांना भेटतो त्यावेळी चर्चा होतात. सध्या अधिवेशनही सुरू आहे. यात प्रामुख्यानं युपीएचं पुनर्गठन व्हावं ही चर्चा होत असते. जर तर ज्या गोष्टीत दम नाही. युपीएचं नेतृत्व अशा नेत्याच्या हाती असावं जे बगैर भाजप पक्षांना एकत्र घेऊन संघटना बनवतील," असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
UPA सध्या विकलांग अवस्थेत संजय राऊत यांचं रोखठोक मत#UPA#Congress#SanjayRaut#Shivsenahttps://t.co/uBxeBoSdBm
— Lokmat (@MiLOKMAT) March 25, 2021
शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का?- नाना पटोले
युपीएचे नेतृत्व कोणी करावे हे युपीएच्या सदस्यांनी ठरवले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का, असा उल्लेख केला होता. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये. इतकाच आमचा सल्ला आहे, असा टोला काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी लगावला.