Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागांत ४४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 18:12 IST2026-01-19T18:06:47+5:302026-01-19T18:12:45+5:30
Mumbai Water Cut: मेट्रो ७-अ प्रकल्पांतर्गत जलवाहिनी जोडणीचे काम करण्यात येणार असल्याने शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा बंद किंवा कमी दाबाने राहणार आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागांत ४४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
मुंबईतील महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेने शहराच्या काही भागांत तब्बल ४४ तास पाणी कपात जाहीर केली आहे. मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पांतर्गत जलवाहिनी वळविण्याचे आणि जोडणीचे काम करण्यात येणार असल्याने, मंगळवारपासून मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. प्रशासनाने नागरिकांना या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा नियमित केला जाईल.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे मेट्रो लाईन ७ अ चे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या आड येणारी मुख्य जलवाहिनी वळविण्यात आली असून, आता या वळविलेल्या जलवाहिनीच्या छेद-जोडणीचे काम पालिकेच्या 'के पूर्व' विभागात केले जाणार आहे. हे काम मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होईल आणि गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत म्हणजेच सलग ४४ तास सुरू राहणार आहे.
कोणत्या वॉर्डांवर होणार परिणाम?
जी उत्तर विभाग: धारावी परिसर- सकाळी आणि सायंकाळी कमी दाबाने पुरवठा.
के पूर्व विभाग: मरोळ, अंधेरी, सिप्झ, विमानतळ परिसर आणि वसाहती- पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.
एस विभाग: विक्रोळी आणि भांडुप पश्चिम भाग- काही भागात कमी दाबाने तर काही भागात पूर्ण बंद.
एच पूर्व विभाग: वांद्रे-कुर्ला संकुल- रात्रीच्या वेळी कमी दाबाने पाणीपुरवठा.
एन विभाग: विक्रोळी पश्चिम आणि घाटकोपर- ठराविक वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
- नागरिकांनी मंगळवारपूर्वीच आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा.
- दुरुस्तीच्या ४४ तासांच्या काळात पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा.
- पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे.