बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 06:26 IST2026-05-18T06:26:39+5:302026-05-18T06:26:49+5:30
मुंबई विद्यापीठाने बीएससी सत्र ६ परीक्षेचा निकाल ८ दिवसांतच जाहीर केला. या परीक्षेसाठी एकूण ७,६४८ एवढे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होते, त्यापैकी ७,३९० एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या तृतीय वर्ष बीएससी सत्र ६ अभ्यासक्रमाच्या १५०१ विद्यार्थ्यांचे एबीसी आयडी अभावी निकाल राखीव ठेवण्यात आले आहे. विद्यापीठाने वारंवार सूचना देऊनही कॉलेजांनी एबीसी आयडी जमा न केल्याने विद्यापीठाने ही कारवाई केली आहे.
मुंबई विद्यापीठाने बीएससी सत्र ६ परीक्षेचा निकाल ८ दिवसांतच जाहीर केला. या परीक्षेसाठी एकूण ७,६४८ एवढे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होते, त्यापैकी ७,३९० एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ३,०३४ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, १,५०१ एवढ्या विद्यार्थ्यांचे निकाल एबीसी आयडीअभावी राखीव ठेवण्यात आले आहेत. या निकालाची उत्तीर्णतेची टक्केवारी ६५.११ एवढी आहे, असे विद्यापीठाने सांगितले आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांची एबीसी आयडी किवा अपार आयडी ही अतिशय महत्त्वाची बाब असून, त्यांनी कमावलेले श्रेयांक याचा तपशील डिजिलॉकरवर उपलब्ध करून दिला जात असतो. त्यांना पुढील शिक्षणाच्या अनुषंगाने किवा वैधतेच्या अनुषंगाने आवश्यक असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र, काही महाविद्यालयांनी काही विद्यार्थ्यांच्या एबीसी आयडीचा तपशील विद्यापीठाकडे सादर न केल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.
यासाठी एबीसी आयडी महत्त्वाचा
एबीसी आयडी विद्यार्थ्यांना एकत्रित केलेले श्रेयांक देशभरातील कोणत्याही विद्यापीठात हस्तांतरित व उपयोग करण्याची मुभा देते.
विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक तपशील ॲकेडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये सुरक्षित ठेवला जात असल्याने त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक कालावधीत वापरता येते. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या युनिक आयडीमुळे दुहेरी नोंदणी, नक्कल किंवा चुकीची नोंद किंवा फसवणूक टाळली जाऊ शकते.
विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील डिजिलॉकर, नॅशनल ॲकेडमिक डिपॉझिटरी आणि युजीसी/एनटीए यांसारख्या शासकीय प्रणालींशी डेटा जोडण्यासाठी एबीसी आयडी आवश्यक आहे.