Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 10:46 IST2026-04-23T10:45:11+5:302026-04-23T10:46:28+5:30
मुंबईच्या हाजी नुराणी चाळीतील रहिवाशांनी उद्यापर्यंत घरे रिकामी न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा म्हाडाने दिला आहे.

Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: वरळी-शिवडी उन्नत मार्गिका प्रकल्पातील प्रभादेवी रेल्वेस्थानकाजवळील बाधित होणाऱ्या हाजी नुराणी चाळीतील रहिवाशांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घरे तोडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. २४ एप्रिलपर्यंत घरे रिकामी करा अन्यथा २७ एप्रिलला तोडकाम करण्यात येईल, असा इशारा ‘एमएमआरडीए’ने दिला आहे. रहिवाशांनी याला विरोध दर्शविला असून, स्थलांतरणासाठी मेअखेरपर्यंत मुदत देण्याची मागणी केली आहे.
वरळी-शिवडी मार्गात प्रभादेवी रेल्वेस्थानकाजवळील हाजी नुरानी चाळ आणि लक्ष्मी निवास या इमारती बाधित होणार आहेत. या प्रकल्पात पुनर्वसनाचा तिढा निर्माण झाल्याने प्रकल्पाला विलंब झाला होता. आता हा पुनर्वसनाचा तिढा मिटला असून ‘एमएमआरडीए’ने रहिवाशांना नजीकच्या भागातच घरे दिली आहेत. मात्र, ‘एमएमआरडीए’ने दिलेली काही घरांचे क्षेत्रफळ हे प्रकल्पबाधितांना मंजूर घरांपेक्षा अधिक आहे. घराच्या अधिकच्या क्षेत्रफळासाठी ‘एमएमआरडीए’कडून बाजारमूल्यानुसार रक्कम आकारली जाणार आहे.
अधिक क्षेत्रफळासाठी मोजावे लागणार २५ लाख
- ‘एमएमआरडीए’ने दिलेली घरे ही मंजूर क्षेत्रफळापेक्षा काहीशी मोठी आहेत. त्यामुळे या घरांच्या अधिकच्या क्षेत्रफळासाठी रहिवाशांना १० लाख ते २५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
- एमएमआरडीए ही रक्कम भरल्याशिवाय नव्या घराच्या चाव्या देत नाही. हाजी नुराणी इमारतीत राहणारे सर्व रहिवासी सर्वसामान्य कुटुंबातून आहेत. त्यामुळे रहिवाशांना एवढी मोठी रक्कम लगेच जमविणे शक्य नाही.
- त्यामुळे हे पैसे गोळा जमा करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. नव्या घरात स्थलांतरित होण्यासाठीही वेळ लागेल. त्यामुळे एमएमआरडीएने मेअखेरपर्यंत घर खाली करण्याची मुदत द्यावी, अशी मागणी रहिवासी मुनाफ ठाकूर यांनी केली आहे.