गारपिटीसाठीही फळपिकांना विमा संरक्षण

By Admin | Updated: January 6, 2015 23:04 IST2015-01-06T23:04:12+5:302015-01-06T23:04:12+5:30

शासनाने गारपिटीपासून पिकांना संरक्षण मिळण्यासाठी, विमा संरक्षण योजना २०१४-१५ पासून सुरू केली आहे

Insurance cover for fruit trees for hail also | गारपिटीसाठीही फळपिकांना विमा संरक्षण

गारपिटीसाठीही फळपिकांना विमा संरक्षण

बारामती : शासनाने गारपिटीपासून पिकांना संरक्षण मिळण्यासाठी, विमा संरक्षण योजना २०१४-१५ पासून सुरू केली आहे. राज्यात पथदर्शक तत्त्वावर हवामान आधारित फळपीक विमा योजना २०११-१२ पासून सुरू होती. मात्र, मागील वर्षापासून
गारपिटीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता, आता गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानालाही विम्याचे संरक्षण मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान अर्ज करावेत.
मागील वर्षी पुणे आणि नाशिक जिल्ह्यात गारपिटीमुळे फळबागांना मोठा फटका बसला होता. द्राक्ष, डाळिंब, केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. मात्र, गारपीट या नैसर्गिक आपत्तीचा समावेश या योजनेमध्ये नसल्याने, यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. गारपीट आणि वाढत्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यासाठी ‘इफ्को टोकिओ’ या विमा कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.
विमा कालावधी संपल्यापासून ४५ दिवसांत नुकसानभरपाईची रक्कम संबंधित विमा कंपनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. तसेच, पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना सक्तीची आहे. तर, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक स्वरूपाची आहे. त्याचबरोबर नुकसानभरपाई मुदतीत देण्याची जबाबदारी विमा कंपनीवर असणार आहे.
मागील वर्षी ९ मार्चला बारामती-इंदापूर तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसला होता. या दोन तालुक्यांत प्रामुख्याने द्राक्ष, केळी आणि डाळिंबाचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात आहे. यामध्य कोट्यवधींचे नुकसान झाले होते. त्यानंतरही अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचे सत्र सुरू आहे. त्यामुळे विशेषत: फळउत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. गारपिटीचा विमा योजनेत समावेश केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (वार्ताहर)

द्राक्ष५०,०००१५,०००१२,०००३,०००
डाळिंब३३,३३३१०,०००८,०००२,०००
केळी३३,३३३१०,०००८,०००२,०००
पेरू१०,०००३,०००२,४००६००

Web Title: Insurance cover for fruit trees for hail also