महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 06:56 IST2026-05-20T06:52:47+5:302026-05-20T06:56:01+5:30
यंदा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ आणि वेळेत पूर्ण करता यावी, यासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तुलनेने लवकर सुरू करण्यात आली आहे.

महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील शून्य फेरी सध्या अंतिम टप्प्यात असून मंगळवार, दि. २० मे रोजी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्याकडील रिक्त जागांची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर करणे अपेक्षित आहे. २१ मेपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू होणार आहे, यासंदर्भात शिक्षण विभागाने संबंधित निर्देश जारी केले आहेत. दरम्यान, आतापर्यंत ९ लाख ५५ हजार विद्यार्थ्यानी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.
यंदा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ आणि वेळेत पूर्ण करता यावी, यासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तुलनेने लवकर सुरू करण्यात आली आहे. शून्य फेरीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाने उर्वरित रिक्त जागांची अचूक माहिती विभागाला देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी २० मे ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, २१ मेपासून सर्वसाधारण आणि कोट्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू होणार आहे. नव्या विद्यार्थ्यांना नोंदणी, तर आधी नोंदणी केलेल्यांना अर्जात बदल आणि पसंतीक्रमाचा भाग-२ भरण्याची
संधी असेल.
अशी असेल प्रवेश प्रक्रिया
अर्जासाठी २२ मे सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत असून २३ ते २६ मे कनिष्ठ महाविद्यालय वाटप प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. २६ ते २८ मे या कालावधीत कटऑफ यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल आणि विद्यार्थ्यांना संदेश पाठविण्यात येतील. त्याच कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. २९ मे रोजी कनिष्ठ महाविद्यालयांकडून रिक्त जागांची माहिती शिक्षण विभागाला देण्यात येणार असून ३० मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.
कोट्यांतर्गत किती प्रवेश क्षमता?
कॅपअंतर्गत १६ लाख १० हजार २९३ ऑनलाइन प्रवेश उपलब्ध आहेत, तर कोट्याअंतर्गत ४ लाख ५९ हजार ६५३ जागा आहेत.
४ लाख २३ हजार ३८९ जागा अद्याप रिक्त आहेत. राज्यातील एकूण २० लाख ६९ हजार ९४० प्रवेश क्षमतेपैकी सध्या केवळ ३६ हजार २६४ प्रवेश झाले असून तब्बल २० लाख ३३ हजार ६७६ जागा अद्याप रिक्त आहेत.