वृद्धेच्या मानहानी दाव्यावर आता दोन महिन्यांत सुनावणी; उच्च न्यायालयाने केली आदेशात सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 07:32 IST2026-04-30T07:32:32+5:302026-04-30T07:32:32+5:30
न्यायालयाने ही विनंती मान्य करत संबंधित टिप्पणी हटवण्याचे आदेश दिले. तसेच, पुढील सुनावणीची तारीख २०४६ वरून बदलून १५ जुलै २०२६ अशी निश्चित केली.

वृद्धेच्या मानहानी दाव्यावर आता दोन महिन्यांत सुनावणी; उच्च न्यायालयाने केली आदेशात सुधारणा
मुंबई - ‘आयुष्याच्या अखेरीस सुरू असलेली अहंकाराची लढाई’ असे म्हणत २०४६ पर्यंत तहकूब केलेल्या मानहानीच्या दाव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दुसऱ्याच दिवशी आपला आदेश बदलत या प्रकरणाची सुनावणी दोनच महिन्यांनंतर म्हणजे १५ जुलै रोजी निश्चित केली.
न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिलेल्या आदेशात पक्षकारांच्या सातत्याने सुरू असलेल्या वादग्रस्त भूमिकेवर टीका केली होती. अशा प्रकारच्या ‘अहंकाराच्या लढाईमुळे’ न्यायालयीन यंत्रणेवर ताण येतो आणि तातडीच्या प्रकरणांना प्राधान्य देता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले होते.
दरम्यान, याचिकाकर्ती तारिणीबेन देसाई यांचे वकील स्वराज जाधव यांनी बुधवारी न्यायालयात अर्ज दाखल करून मंगळवारच्या आदेशातील त्यांच्या विरोधातील निरीक्षणे वगळण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत संबंधित टिप्पणी हटवण्याचे आदेश दिले. तसेच, पुढील सुनावणीची तारीख २०४६ वरून बदलून १५ जुलै २०२६ अशी निश्चित केली.
नेमके प्रकरण काय होते?
नव्वद वर्षीय देसाई यांनी २०१७ मध्ये किलकिलराज भन्साली यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला. मुंबईतील त्यांच्या राहत्या सोसायटीतील वादातून हा दावा उद्भवला. २०१५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील नोटिसा, पत्रव्यवहार आणि ठराव, तसेच देसाई यांना सोसायटीतून वगळण्याच्या ठरावाशी संबंधित बाबी या वादाचा केंद्रबिंदू आहे.
देसाई यांनी सोसायटीच्या पत्रव्यवहारामुळे मानसिक छळ झाल्याचा दावा करत २० कोटींची नुकसानभरपाई मागितली आहे. २०१८ मध्ये या प्रकरणात तडजोडीची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, मात्र ती यशस्वी झाली नाही. त्यानंतर न्यायालयाने वादाचे मुद्दे निश्चित करून दिवाणी खटल्याची प्रक्रिया सुरू केली.
दावा पुढे सुरू ठेवण्याचा आग्रह
मंगळवारच्या आदेशात न्यायालयाने यापूर्वीही पक्षकारांनी बिनशर्त माफी मागितल्यास प्रकरण निकाली काढता येईल, असे सुचवले होते. मात्र देसाई यांनी दावा पुढे चालू ठेवण्याचा आग्रह धरला होता. त्यांच्या वकिलांनी बुधवारीही दावा पुढे नेण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले.