महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय! 'भाजयुमो'च्या मुंबई अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 21:07 IST2026-03-05T21:03:44+5:302026-03-05T21:07:01+5:30
मुंबई युवा मोर्चा महामंत्रीपद यशस्वीरीत्या सांभाळल्यावर मिळाली नवी जबाबदारी

महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय! 'भाजयुमो'च्या मुंबई अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती
भारतीय जनता युवा मोर्चाच्या मुंबईचे तेजस्वी व आक्रमक महामंत्री दीपक आजाद सिंह यांची आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनात त्यांनी दाखवलेली ऊर्जा, जमीनी पातळीवर केलेले अथक परिश्रम आणि पक्षनिष्ठ समर्पण याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील धारावी ही त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी असून त्यांनी एम.बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले आहे. दीपक सिंह यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात धारावी विधानसभा क्षेत्रातील युवा मोर्चा वॉर्ड महामंत्री म्हणून केली. त्यानंतर विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी मुंबई युवा मोर्चा महामंत्रीपद यशस्वीरीत्या सांभाळले आणि आता मुंबई अध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी स्वीकारली आहे.
या काळात त्यांनी सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, युवा सक्षमीकरण, क्रीडा स्पर्धा, पक्षाच्या विचारधारेचा प्रचार आणि जमीनी पातळीवर कार्यकर्त्यांचे संघटन यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. महाविकास आघाडीच्या भ्रष्ट कारभाराच्या काळात वरिष्ठ भाजपा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला. केवळ कार्यालयीन राजकारण न करता कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून सामाजिक व राजकीय प्रश्नांवर आंदोलन करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. नैसर्गिक आपत्ती असो वा सामाजिक समस्या, ते स्वतः मैदानात उतरून जनतेच्या मदतीसाठी तत्पर राहिले आहेत.
दीपक सिंह हे पक्षनिष्ठा, पूर्ण समर्पण आणि प्रामाणिक कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. जमीनी पातळीवर कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत संघटन अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. पारदर्शकता, शिस्त, टीमवर्क आणि धारावी सारख्या आव्हानात्मक भागातही सातत्यपूर्ण सक्रियता ही त्यांची वैशिष्ट्ये असून त्यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमो मुंबई नव्या उंचीवर जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नियुक्तीबद्दल श्री दीपक सिंह यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, भाजपा मुंबई अध्यक्ष श्री अमित साटम जी यांचे विशेष आभार मानले. त्यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि विश्वासामुळेच ही जबाबदारी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी ते म्हणाले, “पक्षाने माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणे पार पाडेन. संघटन अधिक मजबूत करणे, मुंबईतील प्रत्येक युवापर्यंत भाजपची विचारधारा आणि शासनाच्या जनहितकारी योजना पोहोचवणे तसेच राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात युवाशक्तीला जोडणे, हेच माझे ध्येय आहे.”